या भीषण अपघाताबाबत मिळालेल्या महितीनुसार, वर्धा जिल्ह्यातील अंतोरा आष्टी येथील पंकज वलगावकर हे आपली पत्नी कविता आणि मुलगा अन्वित यांचेसह आपल्या दुचाकी क्र. एम एच ३२,ए क्यू ६११० ने अमरावती येथे काही कामानिमित्त येत असतांना मागून भरधावपणे येणाऱ्या वरुड अमरावती एसटी क्र.एम एच ०६, एस८९५९ ने दुचाकीस धडक दिली. यामध्ये समोर बसलेला अन्वित चक्क एसटी बसच्या चाकाखाली येऊन जागीच ठार झाला, तर पंकज आणि कविता दोघेही गंभीररीत्या जखमी झालेत.
संतप्त नागरिकांनी महामार्ग ३ तास रोखून धरला
घटनेनंतर डवरगाव येथील संतप्त नागरिकांनी क्षणातच महामार्ग बंद केला. डवरगाव येथील महामार्गावर अनेकदा अपघात झाले असून याठिकाणी गतिरोधक बसवावे या मागणीसाठी शेकडो निवेदने प्रशासनाला देण्यात आली. मात्र प्रशासन मूग गिळून बसल्याने संताप नागरिकांनी तब्बल दीड तास महामार्ग रोखून धरला.
माहुली जहागीर पोलीस स्टेशन ला घटनेची माहिती मिळताच प्रभारी पो.नि.जयसिंग राजपूत ए.एस.आय हंबर्डे,नापोका पोटे, किरण साधनकर, गजानन धर्माळे, विनोद वाघमारे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले तसेच अन्वितचा मृतदेह उत्तरीय तपासणी साठी पाठविण्यात आला.
संतप्त आंदोलकांना विश्वासात घेऊन आपली मागणी पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला पत्रव्यवहार करू असे आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर जमावाने आंदोलन मागे घेतले. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त होत आहे.