अंबरनाथ : शिवीगाळ केल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथ तालुक्यातील काकडवाल गावात घडला आहे. या प्रकरणी उल्हासनगरच्या हिललाईन पोलिसांनी नारायण भोईर याच्यासह इतर १० जणांवर गुन्हा दाखल केला असून एकाला अटकही केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मलंगगडच्या जवळ असलेल्या काकडवाल गावात राहणाऱ्या नारायण भोईर याने दारूच्या नशेत अरुणा भोईर आणि तिचे पती शिवनाथ भोईर यांना शिवीगाळ केली. यावेळी अरुणा भोईर यांनी नारायण याला शिवीगाळ का करतो, याचा जाब विचारला असता त्यांच्यात भांडण झाले होते. नंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यात गेल्यानंतर दोन्ही कुटुंबाने हे प्रकरण मिटवले होते. मात्र या भांडणाचा राग मनात धरून आरोपी नारायण भोईर याने आपल्या कुटुंबातील आणखी १० सदस्यांना बोलावून फिर्यादी अरुणा भोईर यांच्या कुटुंबावर लोखंडी सळई, लाकडी दांडके आणि दगडाने मारत जीवघेणा हल्ला केला.

Pune Accident: भरधाव वेगातील कार उलटली, तीनवेळा पलटी; तीनजण जागीच ठार, एकजण गंभीर जखमी

या हल्ल्यात अरुणा भोईर यांच्या कुटुंबातील दोन ते तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आता उल्हासनगरच्या हिललाईन पोलिसांनी नारायण भोईरसह इतर १० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसंच अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

उल्हासनगरातही मारहाणीची घटना

अंबरनाथमध्ये कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडलेली असतानाच उल्हासनगरमध्येही एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील सेक्शन ३१ भागात राहणाऱ्या दर्शन दावडा यांना मारहाण करण्यात आली आहे. दर्शन यांच्या बाजूला राहणाऱ्या सुनील दावडा यांच्या घराचे काम सुरू असून त्याचा कचरा हा दर्शन याच्या घरच्या बाजूला पडतो. याची तक्रार दर्शन यांनी उल्हासनगर महापालिकेला केली होती. याचा राग सुनिल आणि त्याच्या मुलांना आल्याने त्यांनी दर्शनला घराचा आवारात मारहाण केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here