Parth Pawar 2019 Loksabha Election | पार्थ पवार यांनी २०१९ साली लोकसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत पार्थ पवार यांचा पराभव झाला होता. त्यावरुनच नितेश राणे यांनी अजितदादांना डिवचले.

 

Ajit Pawar Vs Nitesh Rane
अजित पवार आणि नितेश राणे

हायलाइट्स:

  • अजितदादा म्हणाले राणेंना तर बाईने पाडलं होतं
  • नितेश राणेंनी पार्थ पवारांचा रेकॉर्ड काढला
  • अजित पवार आणि नितेश राणेंमध्ये शाब्दिक युद्ध
मुंबई: शिवसेना पक्ष फोडणाऱ्या सर्वांचा पुढील निवडणुकीत जनतेने पराभव केला. नारायण राणे तर दोनवेळा पडले. एकदा कोकणातून त्यांचा पराभव झाला. तर दुसऱ्यावेळी वांद्रे मतदारसंघात एका बाईने नारायण राणेंना पाडलं, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी नुकतेचे केले होते. कसब्यातील प्रचारसभेत अजित पवार यांनी शिवसेना फोडणारे नेते कधीच यशस्वी झाले नाहीत हे सांगताना भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चांगलीच खिल्ली उडवली होती. या टीकेला नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे यांनी ट्विटरवरुन प्रत्युत्तर दिले आहे.

नितेश राणे यांनी अजितदादांना प्रत्युत्तर देताना त्यांच्या दुखऱ्या जखमेवर बोट ठेवले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मावळ मतदारसंघातून लढणाऱ्या पार्थ पवार यांचा पराभव झाला होता. शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवारांना पराभवाची धूळ चारली होती. हाच धागा पकडत नितेश राणे यांनी अजित पवारांना खोचकपणे प्रत्युत्तर दिले. यावेळी माझा मित्र पार्थला निवडून आणा. गेल्यावेळी बिचाऱ्याला एका साध्या शिवसैनिकाने पाडलं होतं. आगामी निवडणुकीत तरी त्याचं काही होतं का बघा. नारायण राणे साहेब देशाचे केंद्रीय मंत्री आहेत. ते मुख्यमंत्रीपदापर्यंतही पोहोचले होते. पण आपण फक्त भावी मुख्यमंत्रीच्या बॅनरच्या स्पर्धेत अडकलेले दिसत आहात, असा टोला नितेश राणे यांनी अजित पवार यांनी लगावला.

तसेच नारायण राणे यांच्यासोबत शिवसेनेतून बाहेर पडलेले सर्व आमदार पडले, हा दावाही नितेश राणे यांनी खोडून काढला. अजितदादा मोठे नेते आहेत. पण वाचल्या शिवाय जमतच नाही बघा. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्क्रिप्ट रायटरने त्यांना योग्य माहिती लिहून दिली पाहिजे. शाम सावंत यांचा अपवाद वगळता राणे साहेबांसोबत शिवसेनेतून बाहेर पडलेले सर्व आमदार परत निवडून आले. माहिती असू दे दादा, असेही नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

अजित पवार नेमंक काय म्हणाले होते?

शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेले लोक पुढे राजकारणात यशस्वी झाले नाहीत, हे सांगताना अजित पवार यांनी काही उदाहरणं दिली होती. छगन भुजबळ शिवसेनेतून १९ लोकांसह बाहेर पडले होते. त्यानंतर भुजबळ यांच्यासकट सगळं लोक पराभूत झाले. नारायण राणे यांनी शिवसेना फोडली. त्यांच्यासोबतचे पक्षातून बाहेर पडलेले सर्व आमदार पडले. स्वत: नारायण राणे दोनदा पडले. एकदा कोकणात, दुसऱ्यांदा मुंबईतील वांद्रे येथे उभे होते, तिथेही पडले. तिथे तर नारायण राणे यांना एका बाईने पाडलं, अशी बोचरी टीका अजित पवार यांनी केली होती.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here