अजय गवांदे यांनी २०२० मध्ये,कॉलेज ऑफ ॲग्री सोनई येथुन,बीएससी ऍग्री ची पदवी मिळवली आहे. शिक्षण घेतल्यानंतर त्याने एका खासगी कंपनीमध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली. परंतु, नोकरीमध्ये त्याचे मन रमले नाही, अजय नोकरी सोडून शेतीकडे वळला. शेतीमध्ये नवीन प्रयोग करून दुष्काळी भागातील शेतकरी कसा सुखद होईल यासाठी प्रयत्न करू लागला. यासाठी त्याला शैलेश ढवळे या कृषी तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले.
अजय गवांदे यानं ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली मागच्या वर्षी त्याने दोन एकरामध्ये कलिंगड मिरची आणि झेंडूच्या फुलाचं मिश्र पीक घेतले. त्यातून कलिंगडाची ६० टन उत्पन्न झाले. त्यातील ५० टन कलिंगड हे दुबईला निर्यात केली आहेत. अजयला त्यावेळी एका किलो कलिंगडाला सात ते आठ रुपये किलोचा भाव मिळाला.
अजय गवांदे यांनं यावर्षी चार एकरामध्ये उत्पादन घेतले आहे. चार एकरामध्ये तीन आंतरपीकं घेण्यासाठी एकरी ७० ते ८० हजार रुपये खर्च आला आहे. यावर्षी खर्च वजा जाता १७ ते १८ लाख रुपये उत्पन्न राहील अशी अपेक्षा त्याला आहे. तो सध्या सेंद्रीय पद्धतीने शेती करण्यावर भर देत आहे . शेती बरोबरच ४०० गावराण कोंबड्याचे कुकुटपालन त्याने जोडधंदा म्हणून केले आहे.
मिश्र शेतीबद्दल अजय गवांदे म्हणतात, मिश्र शेतीसाठी अधिक खर्च होतो, पण त्यातून चांगलं उत्पन्न मिळतं. ५० टन एकरी कलिंगडाचं उत्पन्न घेण्याचा त्यांचा मानस आहे. मिश्र शेतीसाठी त्यांनी आधुनिक पद्धतींचा वापर केला आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचं योग्य मार्दर्शन घेत अजय यांनी स्वत:च्या शेतातून प्रगतीचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला आहे. झेंडू पीक देखील घेतलं असून सध्या त्याला बाजारात ८० ते १२० रुपये किलोचा भाव मिळत असून बाजारात मागणी असलेलं पीक घेतलं पाहिजे, असं अजय गवांदे म्हणाले. एकपीक पद्धतीऐवजी बहूपीकपद्धतीकडे वळणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले.