‘मविप्र’ संस्थेतील वादाच्या प्रकरणात अॅड. विजय पाटील यांचे अपहरण करुन त्यांच्याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी पुणे येथील कोथरुड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी डेक्कन पोलिसांच्या पथकाने निलेश भोईटे यांच्या घरावर छापा टाकला होता. यावेळी संशयित भोईटे यांच्या घरात अनिधिकृतपणे प्रवेश करत दस्तऐवज दाखल करायचे आणि पोलिसांच्या छाप्यात हस्तगत झाले असे दाखवायचे. तसेच त्यांच्या घरात सूरा ठेवून कट रचून वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींना खोटी माहिती देण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच निलेश भोईटे यांच्या घरातील महत्त्वाचे दस्तऐवज प्रोसेडिंग बुक, रबरी शिक्के, बँकेचे पासबुक, लेटरपॅड हे महत्त्वाचे दस्तऐवज संशयितांनी त्यांच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करून बनावटीकरण करण्यासाठी घेवून गेल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ७ ऑक्टोंबर २०२२ ला शहर पोलिसात निलेश भोईटे यांनी तक्रार दिली होती.
भोईटे यांच्या या तक्रारीवरुन अॅड. विजय भास्कर पाटील व हेमंतकुमार साळुंखे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास करीत असताना तक्रारदाराच्या पुरवणी जबाब आणि गुन्ह्याचा तपासीअंती यामध्ये संशयित तत्कालीन सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण, महेश आनंदा पाटील, संजय भास्कर पाटील, मनोज भास्कर पाटील, जयेश भोईटे आणि सुनील दत्तात्र्य माळी या संशयिताची नावे वाढविण्यात आली आहे. अर्थात, या प्रकरणात अॅड. प्रवीण चव्हाण यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
चाळीसगाव पोलीस ठाण्यात हजेरीसाठी आले आणि जळगाव पोलिसांनी ताब्यात घेतले
चाळीसगाव येथे दाखल खंडणीच्या गुन्ह्यात हजेरीसाठी प्रवीण चव्हाण हे रविवारी चाळीसगावमध्ये आले. यावेळी शहर पोलिसात दाखल गुन्ह्यात जळगाव शहर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. चाळीसगाव येथून चव्हाण यांना जळगाव शहर पोलीस ठाणे येथे आणण्यात आले. पोलीस त्यांची चौकशी करत आहेत. चाळीसगाव पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात त्यांना जामीन झाला आहे. या गुन्ह्यात हजेरी देण्यासाठी ते चाळीसगाव पोलीस ठाण्यात आले होते आणि नेमकं याच दरम्यान जळगाव शहर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती मिळाली आहे.