मूर्ती अनेक ठिकाणी भग्न

अंबाबाईची मूर्ती ही प्राचीन काळातील असल्याने आता त्याची झीज होत आहे. तर मूर्ती काही ठिकाणी भग्न झाली आहे. दरम्यान पुरातत्व विभागाने यापूर्वीही वज्रलेप केला आहे. मात्र मूर्तीचे पाय, कंबर, हात आणि चेहरा या ठिकाणी बदल झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान शास्त्राप्रमाणे भग्न झालेले मूर्ती पुजू नये असं सांगितलं जातं, मात्र कित्येक वर्ष अंबाबाईची मूर्ती अभिषेक न घालताच पुजली जात आहे. तर भक्तांना देखील लांबून म्हणजेच पितळी उंबराच्या बाहेरून दर्शन दिलं जात आहे.
मूर्तीला वज्रलेख आणि रासायनिक प्रक्रिया करून संवर्धन

गेल्या अनेक वर्षांपासून पुरातत्व विभागाकडून मूर्तीला वज्रलेख आणि रासायनिक प्रक्रिया करून संवर्धन केलं जात आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ऑगस्ट – सप्टेंबर दरम्यान देवीच्या ओठांना झालेली दुखापत लपवण्याठी तातडीने १८ आणि १९ सप्टेंबर रोजी एका रात्रीत संवर्धन प्रक्रिया केली. पण त्यानंतर देवीच्या चेहऱ्यावरील पूर्ण भावचं बदलले. त्यानंतर २६ जानेवारीला देवीच्या डाव्या कानाजवळील कपचा निघाला. त्यामुळे श्रीपुजकांनी ही बाब २७ जानेवारी २०२३ रोजी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.
बोटांची झीज, अलंकार अस्पष्ट

कोर्टाने या संदर्भात १४ फेब्रुवारी रोजी सुनावणी ठेवली. पण बेजबाबदार सरकार, पुरातत्व विभाग आणि देवस्थान समिती कडून कोणताच रिप्लाय दिला गेला नाही. यावरुनच सरकार, देवस्थान समिती आणि पुरातत्व विभाग देवीच्या मुर्तीबाबत किती गंभीर आहे हे दिसून येत आहे. सध्या देवीची मूर्ती अत्यंत नाजूक स्थितीत असून देवीच्या पानपात्राचा जो हात आहे, त्या हाताची दोन बोटं पूर्णपणे झीजली आहे. तर म्हाळंग घेतलेल्या उजवा हाताच्या बोटाचीही पूर्ण झीज झाली आहे. तसंच पावलावरील बोटं पूर्णपणे निघून गेली आहेत आणि देवीचं वाहन असणारं सिंहाची पाठीमागील बाजू पूर्णपणे दिसेनाशी झाली असून सिंहाचा चेहराही अस्पष्ट झाला आहे. तर देवीच्या अंगावरील जवळपास सर्व अलंकार अस्पष्ट झालेत. यामुळे आता सरकार आणि पुरातत्व विभाग आणि देवस्थान समितीकडून याबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची गरज आहे.
करवीर पिठाचे शंकराचार्य काय म्हणाले?

ज्या चुका आहेत देवीला कुठे काय झालं आहे हे दिसू नये म्हणून शासनाने म्हणजेच व्यवस्थापन समितीने लांबून दर्शनाचा खेळ केलेला दिसून येतो. कोणत्याही मंदिरातील देवता ही निट स्वरुपात असलीच पाहिजे. तिच्या दर्शनाने प्रसन्नता प्राप्त व्हायला पाहिजे. जर तिच्या अंगाचे व्यंग होत असेल तर प्रसन्नता तर होणारच नाही पण भक्तांना क्लेश मात्र नक्की होतात. आपण कोणाचे दर्शन घेतो हे भक्तांना कळालं नाही तर हे बरोबर नाही. इतक्या लांबून लोक दर्शनाला येतात, त्यांना जर असं विकृत स्वरुप दिसायला लागलं तर ते योग्य नाही, असं करवीर पिठाचे शंकराचार्य विद्यानृसिह भारती यांनी म्हटलं.
‘मूर्ती बाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची गरज’

अंबाबाई मूर्ती संवर्धन आणि वज्रलेपाचे अनेक वेळा प्रयत्न केले गेले आहेत. १९२० साली मूर्तीच्या हातावर तांब्या पडला आणि दुखावला पण तेव्हापासून तो हात तसाच जोडून ठेवला आहे मूर्तीची संवर्धन प्रक्रिया अमलात येण्यासाठी २०१५ उजाडलं. सध्या देवीच्या पाणपत्राचा जो हात आहे त्या हाताची दोन बोटं पूर्णपणे निघून गेली आहेत. पावलावरील बोट पूर्णपणे निघून गेली आहेत. त्यामुळे मूर्ती बाबत लवकरात लवकर निर्णय घेण्याची गरज आहे, असं अंबाबाई मूर्ती अभ्यासक प्रसन्न मालेकर यांनी म्हटलं आहे.