मुंबई : महाराष्ट्रासह आपल्या देशाला विविध प्रकारची प्राणी संपदा आणि मोठी जैवविविधता लाभली आहे. महाराष्ट्राच्या नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात डांगी प्रजातीच्या गायी प्रसिद्ध आहेत. डांगी गायींच्या दुधामध्ये गोडव्याचं प्रमाण जास्त असतं. डांगी गायींच्या दुधापासून खोया नावाचा पदार्थ बनवला जातो. अहमदनगरच्या काही भागात त्याला राजूर असंही म्हटलं जातं. शास्त्रज्ञ, शेतकरी आणि स्थानिक संस्थांनी प्रयत्न केल्यानं या गायींचं संवर्धन झालं आहे. अन्यथा डांगी गायींची प्रजाती नष्ट झाली असती. डांगी गायींच्या संवर्धनासाठी २०१४ पासून एकत्रित प्रयत्न इंडियन इन्स्टि्ट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च, पुणे, बीएआयएफ डेव्हलपमेंट रिसर्च फाऊंडेशन, नवी दिल्ली, स्थानिक शेतकरी, सामाजिक संघटना यांनी २०१४ पासून कामाला सुरुवात केली. या सर्वांनी एकत्र येत नामशेष होणाच्या मार्गावर असलेल्या डांगी गायींची प्रजाती वाचवण्यासाठी काम सुरु केलं. लोकपंचायत संघटनेचे सारंग पांडे त्यांच्या प्रयत्नांविषयी सांगताना म्हणतात, आमची ही स्थानिक संस्था असून अहमदनगरमध्ये काम करते. “डांगी गायी विविध आजारांना तोंड देत होत्या, त्यांच्या पुढं बदलणाऱ्या पर्यावरणाचे, बदलत्या पीक पद्धतीचं आणि बदलत्या चाऱ्याचं आव्हान होतं. त्यामुळं आम्ही डांगी गायींचं योग्य प्रकारे लसीकरण करण्यास सुरुवात केली.” आमच्या त्या प्रयत्नांना यश आल्यानं आता त्या गावांमध्ये डांगी प्रजातीचे सक्षम आणि तरुण बैल असल्याचं पांडे सागंतात. डांगी गायींच्या संवर्धनाच्या निमित्तानं विविध टीम किंवा समूह कार्यरत होते. बहू विद्याशाखीय तज्ज्ञांची पथकं, सामाजिक संघटना, महाराष्ट्रातील स्थानिक लोकं जीन बँकेच्या निर्मितीसाठी प्रयत्न तकर होते. त्याद्वारे डांगी गायी आणि स्थानिक वनस्पतींच्या प्रजाती, प्राणी नामशेष होऊ नये यासाठी प्रयत्न सुरु होते. जीन बँकेच्या माध्यमातून या बँकेच्या माध्यमातून केवळ देशी प्रजातींचं बिायाणं जर्म प्लाझ्म यांच्या जतन संवर्धनासह पारंपारिक ज्ञान देखील जपून ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. डांगी प्रकल्पासाठी पारंपारिक पद्धत म्हणजेच ‘राखन राण’ ही संकल्पना गायींना वर्षभर गवत आणि चारा पुरवठ्यासाठी राबवण्यात आली. शुद्ध प्रजातीच्या संगोपनासाठी ३० कुटुंबांचा मिळून डांगी पालक संघ देखील अहमदनगरमधील अकोले तालुक्यात स्थापन करण्यात आले. आमच्या प्रयत्नांना यश आल्यानं शुद्ध प्रजातीचे डांगी बैल देखील असल्याचं पांडे म्हणाले. आम्ही आता डांगी गायीचं दूध, शेण, खत याचं बाजारात मार्केटिंग करणार असल्याचं ते म्हणाले. ज्या प्रमाणं गीर प्रजातींच्या गायींच्या संवर्धनासाठी प्रचार प्रसार करण्यात आला त्याप्रमाणं काम करण्याचं नियोजन असल्याचं पांडे म्हणाले. पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी २००० मध्ये स्थानिक प्रजातींच्या पिकांचं, वनस्पतींचं संवर्धन आणि मौखिक परंपरांचं आणि त्याच्याशी संबंधित ज्ञानांचं दस्तऐवजीकरण होणं आवश्यक असल्याचं म्हटलं होतं. त्यांनुसार २०१४ ते २०१९ मध्ये राबवण्यात आलेला प्रकल्प यशस्वी झाला असून गेल्या वर्षी यासाठी महाराष्ट्र शासनानं प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठी १७९ कोटी रुपये मंजूर केले आहेत. महाराष्ट्र जीन बँकेचे प्रकल्प संचालक आणि आयआयएसइआरचे सदस्य व्ही. एस. राव यांनी अनेक स्थानिक सजिवांचा जाती या व्यक्तींकडून आणि समाजाकडून जतन केल्या जातात. शेतकऱ्यांना अनेक दशकांपासूनचं ज्ञान हे विविध पिकांबद्दल आणि वनस्पतींबद्दल मौखिक परंपरेतून प्राप्त झालं होतं. आमच्या टीमनं पारंपारिक पद्धती संवर्धित करण्यासाठी प्रयत्न सुरु केल्याचं राव म्हणतात. शेतकऱ्यांच्या सहकार्याच्या धोरणामुळं स्थानिक प्रजाती वाचवण्यात आणि संवर्धित करण्यात आल्याचं राव म्हणाले. सात मुद्यांवर विशेष लक्ष जीन बँक प्रकल्प हा सात मुद्यांवर काम करतो, सागरी जैवविविधता, पीक अनुवांशिक विविधता, पशुधन अनुवांशिक विविधता, देशी माशांचे संवर्धन आणि शाश्वत वापर, गवताळ जमीनीतील जैवविविधतेचे संवर्धन, सामुदायिक वन संसाधन जमिनींचे पर्यावरण पुनर्संचयन आणि नगदी वनस्पती प्रजाती यासाठी जीन बँक कार्यरत आहेत. आम्ही स्थानिक नागरिक आणि सामाजिक संस्थांसोबत कार्यरत असल्याचं राव म्हणतात. तीन राष्ट्रीय संस्था, दोन विद्यापीठे, १६ एनजीओ यामध्ये कार्यरत आहेत. आपल्याकडे समृद्ध जीन साठा असून आपल्याला प्रजाती स्थानिक पर्यावरणाच्या स्वीकृतीसह संवर्धित करायच्या असल्याचं राव म्हणाले. आम्ही या प्रकल्पात लहान मुलांचा देखील समावेश केला असून शालेय विद्यार्थ्यांना वनस्पती, प्राणी आणि गवताच्या प्रजातींची नाव सुट्टीच्या काळात जमा करण्याची जबाबदारी दिली होती. विद्यार्थी आमच्याकडे परत येताना २०० वाण आणि बियाण्यांसह आले, असं राव म्हणाले. आम्हाला याचा जैवविविधता समजून घेण्यासाठी आणि त्याच्या संवर्धनासाठी फायदा झाल्याचं राव म्हणाले. जीन बँकेद्वारे पुण्यात जीनोटाईप्स पुढील संदर्भासाठी जतन केले जात आहेत. समुदाय आधारित बियाणे बँक स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांकडून राबवल्या जातात. शेतकरी बियाणं घेतात पीक काढल्यानंतर ते पुन्हा जमा करतात. अशा प्रकारच्या बियाणे बँका पालघरच्या जवाहर तालुक्यात, अहमदनगरच्या अकोले आणि भंडारा जिल्ह्यात सुरु आहेत. या बँकेचे सदस्य एक किलो बियाणं घेतात आणि दोन किलो परत करतात. सहकारी संस्था देखील सदस्यांकडून चालवल्या जातात. आम्ही त्यांना जिनोम सेवियर्स म्हणतो, असं राव म्हणाले. यूनिक जिनोम सेवियर्सची नोंद नॅशनल ब्यूरो ऑफ प्लँट जेनेटिक्स कडे केली जाते, असं राव म्हणाले. आता प्रत्येक ग्रुप संवर्धनाच्या कामात पुढाकार घेत आहे. संगमनेरमधील कटक प्रजातीच्या शेळीचं संवर्धन करण्याचं काम सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here