maharashtra women stuck in oman and dubai, महाराष्ट्रातील अडीच हजार महिलांना फसवून ओमान, दुबईत नेले; मोबाईलही काढून घेतल्याने ठावठिकाणा नाही – about 2500 women from maharashtra are stuck in oman and dubai according to rupali chakankar
अहमदनगर : ‘महाराष्ट्रातील अडीच हजारावर महिला ओमान व दुबईमध्ये अडकल्या आहेत. त्यांना फसवून तेथे नेले असून, त्यांच्याजवळील कागदपत्रे व मोबाईलही काढून घेतल्याने त्यांचा ठावठिकाणा लागत नाही. दहा दिवसांपूर्वी तेथून एक महिला कशीबशी सुटका करून भारतात आल्यावर हा प्रकार उघडकीस आला आहे. अडकलेल्या इतर महिलांची सुटका करण्याचे प्रयत्न परराष्ट्र खाते व त्या देशांतील भारतीय दुतावासाच्या मदतीने सुरू आहे,’ अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली.
राज्य महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमानिमित्त अध्यक्षा चाकणकर नगरला आल्या होत्या. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी महिलांच्या तक्रारींवर जनसुनावणी घेतली. त्यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. त्या म्हणाल्या, ‘करोना काळात अनेक घरात कर्त्या पुरुषाचे निधन झाल्याने त्या घरातील महिला व मुलींसमोर उपजीविकेचा प्रश्न होता. त्यावेळी ओमान व दुबईमधील कुटुंबात घरगुती कामासाठी एजंटमार्फत अनेकजणी तिकडे गेल्या. मात्र, त्यांना फसवून तिकडे नेले गेले होते. तेथे विमानतळावर पोहोचल्यावर या महिलांकडील कागदपत्रे व मोबाईल काढून घेण्यात आले. मध्यंतरी यापैकी काही महिलांनी त्यांचे व्हीडीओ पाठवले होते. त्यावरून शोध सुरू आहे. सुटका करून आलेल्या महिलेच्या तक्रारीवर मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे,’ असेही त्यांनी सांगितले. Breaking News: IPL 2023च्या आधीच मुंबई इंडियन्ससाठी सर्वात वाईट बातमी; बुमराह संपूर्ण स्पर्धेला मुकणार
सर्व स्थानिक स्वराज्यसंस्थांमध्ये हिरकणी कक्ष व महिलांना स्वतःची ओळख न देता तक्रार करण्यासाठीचे ड्रॉप बॉक्स (तक्रार पेटी) बसवण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत. शाळा-महाविद्यालये तसेच बसस्थानकांवरील महिलांसाठीची स्वच्छतागृहे स्वच्छ असावीत, तेथे पाण्याची पुरेशी सोय असावी. बालविवाह रोखण्यासाठी संबंधित दोन्ही कुटुंबातील सदस्य, गुरुजी व अन्यनातेवाईकांसह गावाचे सरपंच, सदस्य व ग्रामसेवकांवर गुन्हे दाखल करूनलोकप्रतिनिधींवर जबाबदारी निश्चित होण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.