व्याजदरात वाढ केल्यामुळे तिसऱ्या तिमाहीत भारताच्या आर्थिक विकासात मंदी येण्याची शक्यता अर्थशास्त्रज्ञांनी सर्वेक्षणात वर्तवली होती. चालू तिमाहीत भारताची अर्थव्यवस्था आणखी ४.४ टक्क्यांपर्यंत खाली येण्याचा अंदाज सरकारी आकडेवारीत वर्तवण्यात आला होता.
सांख्यिकी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या तिसऱ्या तिमाहीत भारताचा जीडीपी दर ४.४ टक्के आहे. यापूर्वी जीडीपी वाढ एप्रिल-जूनमध्ये १३.५ टक्के आणि जुलै-सप्टेंबर मध्ये ६.३ टक्के नोंदवली गेली होती. त्याच वेळी गेल्या वर्षी याच तिमाहीत जीडीपी वाढ ५.४ टक्के होती. आर्थिक वर्ष २०२३ च्या पहिल्या तिमाहीत मुख्यतः कोरोनामुळे अर्थव्यवस्था मागील तिमाहीतील १३.५ टक्क्यांवरून ६.३ टक्क्यांपर्यंत खाली आली होती.
जीडीपी ४०.१९ लाख कोटींवर
सरकारने म्हटले की, वास्तविक जीडीपी २०२२-२३ च्या आर्थिक वर्षाच्या तिसर्या तिमाहीत ४०.१९ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मागील वर्षाच्या याच तिमाहीत जीडीपी ३८.५१ लाख कोटी रुपये होता. ही वाढ ४.४ टक्के आहे. त्याच वेळी नाममात्र जीडीपी २०२२-२३ मध्ये ६९.३८ लाख कोटींवर पोहोचला, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत ६२.३९ लाख कोटी होता. ही वाढ ११.२ टक्के आहे.
जीडीपीमध्ये घट होण्याची कारणे
– महागाई कमी करण्यासाठी आरबीआयने व्याजदरात वाढ केली
– काही तज्ज्ञ बेस इफेक्टलाही याचे कारण मानत आहेत.
– निर्यात आणि ग्राहकांच्या मागणीत मंदी
सरकारचा वाढीचा अंदाज आरबीआयपेक्षा जास्त
डिसेंबरमध्ये आरबीआयने संपूर्ण आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी ६.८% वाढीचा अंदाज व्यक्त केला होता. मात्र, पुढील महिन्यात सांख्यिकी मंत्रालयाने जीडीपीच्या पहिल्या आगाऊ अंदाजात ७ टक्के वाढीचा अंदाज व्यक्त केला होता आणि आजही म्हणजेच दुसऱ्या आगाऊ अंदाजात ७% वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे.