उद्या हजारो संजय राऊत तयार होतील आणि विधानमंडळाला चोर म्हणतील. आपल्या मनासारखे झाले नाही म्हणून दररोज विधिमंडळाचा अपमान करतील. त्यामुळे संजय राऊतांचे वक्तव्य आपण गांभीर्याने घेतले पाहिजे आणि याप्रकरणात विधानसभा अध्यक्षांनी त्यांना योग्य वाटेल तो निर्णय घ्यावा, मला त्यामध्ये हस्तक्षेप करायचा नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
संजय राऊत यांनी बुधवारी कोल्हापूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना विधिमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केला होता. या वक्तव्यावरुन आज सकाळपासूनच विधानसभा आणि विधानपरिषेदत भाजपच्या सदस्यांनी रान उठवायचा सुरुवात केली. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव मांडण्यासाठी नोटीस दिली. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत अत्यंत आक्रमक भाषेत आणि त्वेषाने भाषण केले. त्यांनी महाराष्ट्राच्या विधानमंडळाच्या प्रतिष्ठेचा दाखला देत संजय राऊत यांचे वक्तव्य कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाता कामा नये, असे म्हटले. या देशात कोणी न्यायालयाविरोधात बोलत असेल तर तो कंटेम्प्ट ऑफ कोर्ट (न्यायलयाचा अवमान) ठरतो. अशी तरतूद नसती तर आपल्या बाजूने निर्णय न लागल्यास कोणीही न्यायसंस्थेवर आरोप केले असते. परिणामी लोकांचा न्यायसंस्थेवरचा विश्वास उडाला असता. त्याप्रमाणेच संजय राऊत यांचे वक्तव्य म्हणजे कंटेम्प्ट ऑफ विधानमंडळ आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
संजय राऊत हे विधानमंडळाला चोरमंडळ म्हणत असतील तर उद्धव ठाकरे हेदेखील याच सभागृहाचे सदस्य आहेत. तेदेखील चोरमंडळाचा भाग ठरतील. संजय राऊतांनी विधानमंडळाला उघडपणे चोरमंडळ, गुंडा मंडळ म्हटले आहे. आम्ही काय गुंड आहोत का?, असा संतप्त सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला.
संजय राऊत हे काही साधे नेते नाहीत, ते राज्यसभेचे सदस्य आहेत. एका मोठ्या सभागृहाचे नेते अशाप्रकारे बोलणार असतील तर आम्ही ते कसे सहन करायचे? आज आपण त्यांच्या वक्तव्याचा निषेध केला नाही तर उद्या हजारो संजय राऊत तयार होतील आणि विधानमंडळाला चोर म्हणतील. हा विधानमंडळाचा घोर अपमान आहे. आमच्या पक्षाच्या नेत्यानेही असं वक्तव्य केलं असतं तर आम्ही खपवून घेतले नसते. विधानमंडळाने याबाबत योग्य तो संदेश दिला पाहिजे. विधानमंडळाबाबत अशाप्रकारची वक्तव्य करणाऱ्यांवर काय कारवाई होते, याकडे संपूर्ण जनतेचे लक्ष लागले आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.