Kasba Peth Bypoll Election Ravindra Dhangekar : कसबा विधानसभेची जागा कोण जिंकणार याबाबत संपूर्ण राज्यभरात उत्कंठा होती. भारतीय जनता पक्षाचा हा मतदारसंघ बालेकिल्ला मानला जात असल्यानं भाजपसाठी ही जागा अत्यंत प्रतिष्ठेची होती. तर महाविकास आघाडीला राज्यातल्या सत्ताबदलानंतर आपली ताकद दाखवून देण्याची संधी होती त्यामुळे ही निवडणूक चुरशीची ठरली. भाजपनं सर्व ताकद लावूनही काँग्रेसचे रवींद्र धंगेकर निवडून आले.

उमेदवार म्हणून रवींद्र धंगेकरांची केलेली निवड

उमेदवार म्हणून रवींद्र धंगेकरांची केलेली निवड

कसब्यात काँग्रेसचं विजयाचं महत्वाचं कारण म्हणजे विधानसभेसाठी उमेदवार म्हणून रवींद्र धंगेकरांची केलेली निवड. रवींद्र धंगेकरांशिवाय महाविकास आघाडीचा दुसरा उमेदवार असता तर ही निवडणूक जिंकणे जवळपास अशक्य होते. काँग्रेसने हा विजय मिळवला याचे मोठे श्रेय रवींद्र धंगेकरांना स्वत:ला आहे. अत्यंत तगडा जनसंपर्क असलेला उमेदवार ही धंगेकरांची सर्वात जमेची बाजू. नगरसेवक म्हणून काम करत असताना कायम लोकांसाठी उपलब्ध असणे, कायम जनतेत मिसळून राहणे यामुळे धंगेकरांबद्दल आपुलकी असणारा मोठा वर्ग या मतदारसंघात आहे. तो वर्ग धंगेकरांच्या पाठिशी राहिला. तुलनेनं हेमंत रासने जनसंपर्काच्या मुद्यावरून धंगेकरांपुढे तोकडे पडले. धंगेकरांचा जितका जनसंपर्क आहे तितका रासनेंचा नव्हता.

महाविकास आघाडीने दाखवलेली एकी

महाविकास आघाडीने दाखवलेली एकी

काँग्रेसच्या विजयाचे दुसरे महत्वाचे कारण म्हणजे महाविकास आघाडीने दाखवलेली एकी. महाविकास आघाडीत काँग्रेसच्या वाट्याला ही जागा गेल्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटानं अगदी एकदिलानं ही उमेदवारी स्वीकारल्यामुळे धंगेकरांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. एरवी महाविकास आघाडीतील धुसफूस किंवा बेदिली वेळोवेळी दिसून आली आहे. पण या निवडणुकीत महाविकास आघाडी एकसंध दिसली.काँग्रेस नेत्यांसोबतच अजित पवार, आदित्य ठाकरे हे नेतेही हिरिरीने प्रचारात उतरले. तिन्ही पक्षांची ताकद एकत्र आली आणि त्याचा थेट फायदा धंगेकरांना झाला. महाविकास आघाडीतील पक्षांसाठी ही शिकवण आहे की एकसंध राहिल्यास निवडणुकीत यश मिळू शकते.

काँग्रेसमध्ये आलेलं चैतन्य, शिवसैनिकांचा आक्रमक प्रचार

काँग्रेसमध्ये आलेलं चैतन्य, शिवसैनिकांचा आक्रमक प्रचार

कसब्यात धंगेकरांच्या विजयाचे तिसरे कारण म्हणजे काँग्रेसमध्ये आलेलं चैतन्य आणि ठाकरे गटासाठी प्रतिष्ठेची ठरलेली लढत . धंगेकरांच्या उमेदवारीनंतर कसब्यात जे वातावरण निर्माण झाले त्यामुळे अर्थातच काँग्रेस कार्यकर्त्यांची मरगळ झटकली गेली आणि ते अत्यंत जोमाने प्रचारात उतरले. काँग्रेसमधील गटतटही बाजूला पडले. सोबतच शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी करो या मरो अशी भूमिका घेत पूर्ण ताकद पणाला लावली. उद्धव ठाकरेंकडून शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गेल्यानंतर ठाकरे गटाचे शिवसैनिक अधिक आक्रमकपणे भाजप विरोधात प्रचारात उतरले. ही काँग्रेसच्या विजयासाठी जमेची बाजू ठरली.

गिरीश बापटांची अनुपस्थिती

गिरीश बापटांची अनुपस्थिती

धंगेकरांच्या विजयाचे चौथे कारण म्हणजे गिरीश बापटांच्या कार्यकर्त्यांची प्रचारात अपेक्षित सक्रियता नसणे. कसबा हा खरं तर भाजपपेक्षा गिरीश बापटांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. गिरीश बापटांचे या मतदारसंघावर एकहाती वर्चस्व राहिले आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे गिरीश बापट स्वत: प्रचारात थेट सक्रियपणे उतरू शकले नाहीत. गिरीश बापटांना मोठा कार्यकर्ता वर्ग कसबा मतदारसंघ आहे. तो जरी प्रचारात सहभागी असला तरी अपेक्षित असा सक्रिय नव्हता. उमेदवारी ठरवताना गिरीश बापटांना विश्वासात घेतले गेले नाही हे यामागचे एक कारण मानले जाते.

धंगेकरांच्या विजयात मनसैनिकांचा वाटा

धंगेकरांच्या विजयात मनसैनिकांचा वाटा

धंगेकरांच्या विजयाला मनसेचाही हातभार लागला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी कसबा मतदारसंघात पक्षाचा उमेदवार न देता भाजप उमेदवाराला पाठिंबा दिला. पण कसबा मतदारसंघातील मनसेच्या कार्यकर्त्यांना हा निर्णय पचनी पडला नाही. रवींद्र धंगेकर हे काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी मनसेत होते. त्यामुळे मनसेतील अनेकांसाठी ते आपला माणूस होते. म्हणून राज ठाकरेंचा आदेश डावलून मनसैनिकांनी धंगेकरांना सक्रिय पाठिंबा दिला. अगदी कारवाईचीही पर्वा या कार्यकर्त्यांनी केली नाही. मनसैनिकांचा हा पाठिंबाही धंगेकरांसाठी महत्वाचा ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here