म. टा. प्रतिनिधी, पुणे : राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे निकाल काल गुरुवारी जाहीर झाले आहेत. ‘कसबा पेठ’ या भारतीय जनता पक्षाच्या पारंपरिक बालेकिल्ल्याला खिंडार पाडताना काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे हेमंत रासने यांचा १० हजार ९१५ मतांनी पराभव करून ‘कसब्यात कमळच’ या अतिआत्मविश्वासाच्या पाकळ्या पूर्णत: विखरून टाकल्या आहेत.

चिंचवड मतदारसंघात दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी अपेक्षेनुसार विजय मिळवला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांचा ३६ हजार १६८ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी घेतलेली मते भाजपच्या विजयात निर्णायक ठरल्याचा दावा केला जात आहे. भाजपची विधानसभेतील एक जागा खेचून आणल्याने महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांत आनंदाचं वातावरण आहे, तर कसबा पेठेची हक्काची जागा गमावल्याने भाजपने ‘आत्मचिंतना’चा मार्ग अवलंबणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

राहुल कलाटेंची उमेदवारी अश्विनी जगतापांच्या कशी पथ्यावर पडली? पाहा पोटनिवडणुकीत काय घडलं

भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील सर्व शहर, जिल्हा संघटनांमध्ये तातडीने बदल करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या महिनाअखेरीस शहर भाजपमध्येही मोठ्या प्रमाणात बदल करण्याचे संकेत आहेत. कसबा पेठ पोटनिवडणुकीतील पराभवामुळे पुणे शहरातील बदलांना महत्त्व प्राप्त झाल्याचा गौप्यस्फोट भाजपमधील एका ज्येष्ठ नेत्याने केला आहे.

केंद्रीय नेतृत्वाकडून महिनाअखेरीस राज्यातील भाजप संघटनेमध्ये बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुणे शहर संघटनेचेही मुदत संपल्याने बदल करण्यात येणार आहेत. कसबा पेठ पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवाची कारणमीमांसा करणारा अहवाल राज्यातील नेतृत्वाने तयार करण्याच्या सूचना काही घटकांना दिल्या आहेत. हा अहवाल तयार करताना ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, विधान परिषदेतील भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड आदींच्या प्रतिक्रियाही नोंदविण्यात येणार असल्याचे समजते.

कसबा पेठ निवडणुकीत झालेल्या चुका, धोरणात्मक निर्णय, संघटनेतील अंतर्गत वाद, अशा अनेक घटकांचा उहापोह या अहवालात करण्यात येणार आहे. त्यानुसार कसब्यात मदत न करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांचीही विशेष ‘दखल’ घेतली जाणार असल्याचे समजते. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) समन्वय गेल्या काही वर्षांत तुलनेने चांगला राहिला नसल्याच्या तक्रारी या निवडणुकीच्या निमित्ताने झाल्या आहेत. त्यामध्येही सुसूत्रता आणण्यात येणार असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here