कापसाला १५ हजार प्रती क्विंटल भाव मिळावा, केळी पिक विम्यातील जटील अटी रद्द कराव्यात, केळी उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळावे, अशा शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर राष्ट्रवादीकडून जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, राष्ट्रवादीच्या नेत्या तथा एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली मुक्ताईनगर येथे काल शुक्रवारी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
मुक्ताईनगर शहरातील मंगल कार्यालयापासून या मोर्चाला सुरुवात झाली. तहसील कार्यालयाजवळ आल्यानंतर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. केळीचे खोड, कांद्याच्या माळा, कापूस आणि राष्ट्रवादी पक्षाचे झेंडे लाऊन मोर्चात सहभागी झालेल्या बैलगाड्यांनीही लक्ष वेधलं. रोहिणी खडसे आणि पदाधिकारी हे बैलगाडीत बसूनच मोर्चात सहभागी झाल्याचं यावेळी पाहायला मिळाले. मोठ्या संख्येने कार्यकर्ते तसेच शेतकरी या मोर्चात सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं.
त्यानंतर सभेमध्ये रोहिणी खडसे यांनी आपल्या भाषणादरम्यान मोदी सरकारवर गॅस दरवाढीसहित विविध मुद्द्यांवरून जोरदार टीका केली. त्यांचे भाषण सुरु असतानाच उपस्थितांमधून एक शेतकरी उठला आणि त्या शेतकऱ्याने स्वत:च्या अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी वेळीस शेतकऱ्याच्या हातून पेट्रोलचा कॅन हिसकावल्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र, या प्रकारामुळे सभेत एकच खळबळ उडाली होती.
शेतात, कपाशी आणि मका लावला आहे. मात्र, भावच मिळाला नाही, ५० हजारांचे कर्ज आहे, कर्ज कसं भरायचं?, शासनाचे दुर्लक्ष आहे, जगायचं कसं? असं आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याने पत्रकारांशी बोलतांना सांगितलं.