अजित पवार आज (मंगळवारी) अहमदनगर दौऱ्यावर होते. अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. त्या नुकसानाची पाहणी केल्यानंतर अजितदादांनी प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधला. ‘राज्यात गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कापूस, कांदा, सोयाबीन, द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी प्रचंड हवालदिल झाला असताना त्याला आधार देणे हे राज्य सरकारचे काम आहे. या सरकारला काही चांगले सांगायला गेलो, तरी राग येतो…’ अशी टीका त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केली. त्याचवेळी अजित पवार यांना उद्धव ठाकरे यांच्या सभेविषयी प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला अजितदादांनी मिश्किल उत्तर दिलं.
अजितदादा म्हणाले, “विरोधक म्हणतायेत की उद्धव ठाकरेंच्या सभेला आम्ही गर्दी जमवली. पण आमचाच माजी आमदार संजय कदम फुटला. त्यानेच उद्धव ठाकरेंच्या सभेत शिवसेनेत प्रवेश केला आणि आम्ही कशाला गर्दी जमवू…?” असं उत्तर देत असताना अजित पवार मिश्किलपणे हसले. “बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना आणि आयुष्यभर जपलेलं धनुष्यबाण निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना न देता एकनाथ शिंदे यांना दिलं. महाराष्ट्राच्या जनतेला हे बिल्कुल आवडलेलं नाही. कालची उद्धव ठाकरेंची खेडची सभा आठवा. विरोधक आता म्हणतायेत की त्या सभेत आमची माणसं होती. पण आमचाच माजी आमदार फुटला, आम्ही कशाला गर्दी जमवू…?” असं ते म्हणाले.
दरम्यान, खेडच्या सभेत राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा ध्वज हाती घेतला. रामदास कदम यांचे सुपुत्र योगेश कदम यांच्या विरोधात संजय कदम पुढील विधानसभेची निवडणूक लढतील. खेडच्या सभेत बोलताना योगेश कदम यांचा पराभव करु, अशी शपथच संजय कदम यांनी घेतली. योगेश कदम यांनी ठाकरेंच्या साथीला जाण्याचा निर्णय घेतल्याने खेडमध्ये रामदास कदम आणि योगेश कदम यांच्यासमोर मोठं आव्हान निर्माण झालंय.
ना पक्ष ना चिन्ह, तरीही ठाकरेंनी तीन नेत्यांचं टेन्शन वाढवणारी गर्दी जमवली