इमारतींमधील एफ इमारत पूर्णपणे धोकादायक झाली असल्याने या इमारतींमुळे परिसरातील इमारतींना धोका म्हणून ही इमारत अत्याधुनिक यंत्रणेच्या सहाय्याने जमीनदोस्त केली जाणार होती. मात्र मनसे आमदार राजू पाटील यांनी पालिका आणि अग्निशमन विभागला विनंती केली, सदर नागरिकांना आपले महत्त्वाचे सामान काढून घेऊन द्या मगच ही इमारत जमीनदोस्त करा, असे सांगितले
दरम्यान, घरातून सामान बाहेर काढताना रहिवाशांना गहिवरुन आले होते. घरातील पाळीव कुत्रा आणि ससा यांना रहिवाशांनी कुटुंबातील सदस्याप्रमाणे सुखरुप बाहेर काढले. जीविताला कोणताही धोका निर्माण होणार नाही अशा पध्दतीने रहिवासी धोकादायक इमारतीत आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांसोबत जाऊन आवश्यक सामान घरातून बाहेर काढत होते.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे उपायुक्त सुधाकर जगताप, सहाय्यक आयुक्त भारत पवार, अग्निशमन विभागाचे प्रमुख नामदेव चौधरी, सुरजकुमार यादव, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त, अग्निशमन प्रमुख अविनाश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या भागात कोणताही धोका होणार नाही यादृष्टीने उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली रहिवाशांनी घरातून सामान बाहेर काढले.
आपत्कालीन पथकांनी रहिवाशांचे सामान सुखरुप बाहेर काढण्यात महत्वाची कामगिरी बजावली. घटनास्थळी आमदार राजू पाटील आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावत मदत केली. शांती उपवनमधील इमारतींची अनेक वर्षांत देखभाल व दुरुस्ती न केल्याने हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे, तर आम्हाला आमच्या हक्काचे घर द्या, अशी मागणी रहिवाशांनी लावून धरली आहे. आता शासन-प्रशासन या संदर्भात काय निर्णय घेते याकडे शांती उपवनमधून बेघर झालेल्या साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.