सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे नदी किंवा धरणामध्ये पोहणार्यांची संख्या कमी नाही. पोहण्याची इच्छा झाली की, अतिउत्साही मुले पोहण्याची जिद्द पूर्ण करतात. परंतु त्यांना पाण्याच्या खोलीची जाणीव असायला हवी. गेल्या दोन दिवसापासून अवकाळी पाऊस बरसल्याने जलस्रोतांमध्ये पाण्याची वाढ झाली आहे.
जलसाठ्याची भूल पडल्याने मोताळा तालुक्यातील तालखेड येथील कुणाल वैतकार हा ९ वर्षीय चिमुकला पोहताना मृत्युमुखी पडला आहे. त्यामुळे रंगपंचमी तालखेडात रात्री शोककळेत बदलली. २८ फेब्रुवारीला करवंड येथील दोन मुलांचा देखील धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. त्यामुळे धरणावरील सुरक्षा रक्षकांनी करडी नजर ठेवणे अत्यावश्यक ठरत असून, तैरना मना है!, हे लहान- मोठ्यांनी समजून घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील तालखेड येथे धुळवड खेळून दुपारी गावालगतच्या पाटाच्या पाण्यात पोहण्यासाठी कुणाल रामदास वैतकार व त्याच्या मोठ्या काकांचा मुलगा गेला होता. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने कुणाल बुडाला. दरम्यान, मोठ्या चुलत भावाने लोकांना आराडाओरड करुन बोलवून आणले, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. कुणाल हा आई-वडिलांना एकलुता एक मुलगा असल्यामुळे वैतकार कुटुंबासह गावावरदेखील शोककळा पसरली.
तत्पूर्वी २८ फेब्रुवारीला दुपारी चिखली तालुक्यातील करवंड येथील अनिकेत आणि आदित्य हे दोघे मित्र गावाशेजारी असलेल्या धरणावर पोहायला गेले. मात्र पाण्यात बुडाल्यानंतर परतलेच नाहीत. अनिकेत इयत्ता चौथी तर आदित्य इयत्ता पाचवी शिकत होता.
गेल्या दोन दिवसापासून अवकाळी पावसाने कहर केला आहे. जलस्रोतांची पाणीपातळी वाढली आहे. उन्हाळ्यात लहान-मोठे सर्वच पोहण्यासाठी उत्सुक असतात. अतिउत्साही मुलांची धरणांवर गर्दी दिसून येते. त्यांना धरणावरील सुरक्षा रक्षकदेखील मनाई करीत नाहीत. त्यामुळे सुरक्षारक्षकांनी व पालकांनी देखील याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले तर अशा घटना घडणार नाहीत, अशी अपेक्षा जाणकार व्यक्त करीत आहेत.
पिकांना भाव नाही, त्यात अवकाळी पाऊस; पिकं आडवी झाल्याचे पाहून शेतकऱ्याने घेतले तोंड झोडून