Pune crime News| वेल्हे येथे सोमवारी एका व्यक्तीचा भरदिवसा हॉटेलमध्ये बसला असताना खून करण्यात आला होता. पुण्यातील वाढती गुन्हेगारी ही चिंतेचा विषय ठरत आहे. पोलिसांनी अवघ्या काही तासांत गुन्ह्याचा छडा लावला आहे.

हायलाइट्स:
- कुटुंबाने मिळून रचला कट, मग काढला काटा
- वेल्हे तालुक्यातील खून प्रकरणात कुटुंबासह आरोपींना अटक
माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर लक्ष्मण रेणुसे (वय ५६)रा. पाबे, ता. वेल्हा, जि. पुणे. सध्या रा. २२५,२२६, काळभोरवाडा, शुक्रवार पेठ, पुणे, आकाश कुमार शेटे, (वय 24), रा. १९१, शुक्रवार पेठ, पुणे, यश ऊर्फ प्रथमेश विनायक चित्ते (वय २२ ) रा. २०६, शुक्रवार पेठ, पुणे, अक्षय गणेश साळुंखे (वय २७) रा. १९१, शुक्रवार पेठ, पुणे. शुभम राजेश थोरात, (वय २१ वर्षे, रा. २१८, शुक्रवार पेठ, पुणे, मुळ रा. भालगुडी, ता. मुळशी, जि पुणे) यांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वेल्हे तालुक्यातील पाबे येथे राहणारा नवनाथ रेणूसे याचा खून करण्यात आला होता. खून केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. त्यानंतर पोलिसांना खबऱ्यांमार्फत माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर लक्ष्मण रेणुसे हा साथीदारासह किरकटवाडी, ता. हवेली, जि. पुणे या ठिकाणी आला असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्यांना सापळा रचून ताब्यात घेतले. माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर लक्ष्मण रेणुसे याच्या जमिनीच्या व्यवहारात मृत नवनाथ ऊर्फ पप्पु नामदेव रेणुसे हा हस्तक्षेप करत होता. तसेच माऊली रेणुसे याचा मुलगा एक वर्षांपूर्वी मयत झाला होता. त्याच्या मृत्युस नवनाथ रेणुसे हाच जबाबदार असल्याचा समज त्याच्या मनात होता. यावरून त्याचा खून केल्याचे तपासात उघड झाले आहे.
हा गुन्हा करण्यापूर्वी ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली लक्ष्मण रेणुसे यांनी त्यांची पत्नी कुंदा ज्ञानेश्वर रेणुसे (वय ४५), मुलगी पल्लवी भूषण येणपुरे ( वय ३० ), मुलगी गौरी, अमोल ऊर्फ शशीकांत शिंदे( वय २७ ) यांच्यासह मिळून खुनाचा कट रचला होता. त्यानुसार पुढील सर्व गोष्टी पार पडल्या. सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले पाटील हे करीत आहेत.
नेमकं काय घडलं होतं?
तोरणा गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या वेल्हे परिसरातील हॉटेलमध्ये सोमवारी नवनाथ रेणूसे यांची हत्या करण्यात आली होती. येथील हॉटेल विसावामध्ये बसले असताना दुचाकीवरुन आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्या तोंडावर धारदार शस्त्रांनी सपासप वार केले होते. त्यांच्यावर गोळ्याही झाडण्यात आल्या होत्या. या हल्ल्यात नवनात रेणूसे यांचा मृत्यू झाला होता.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.