नागपूर : पतीविरूद्ध पोलिसांत तक्रार देऊन परतताच पतीने हातोड्याने वार करून पत्नीची हत्या केली. ही थरारक घटना बुधवारी दुपारी कळमना स्टेशनअंतर्गत मिनीमातानगर येथे घडली. या घटनेने पोलिसांमध्ये खळबळ उडाली असून, पोलिसांनी मारेकरी पतीला अटक केली आहे. अमर भारद्वाज (वय ५०), असे अटकेतील पतीचे तर ललिता भारद्वाज (वय ४०), असे मृतकाचे नाव आहे. अमर याचा फळभाजी विक्रीचा व्यवसाय असून, ललिता या ब्युटी पार्लरमध्ये काम करायच्या. त्यांना दोन मुली आहेत.
संतप्त अमरने हतोड्याने ललितांच्या डोक्यावर वार केले. ललिता यांनी आरडाओरड केली. त्यांच्या मुली तळमजल्यावरील खोलीत आल्या. तोपर्यंत ललिता यांचा मृत्यू झाला होता. मुलींना धायमोकलून रडायला सुरूवात केली. शेजारी जमले. तत्पूर्वी अमर हा कळमना पोलिस ठाणे गाठून हजर झाला. घटनेची माहिती कळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह कळमना पोलिसांचा ताफा मिनीमातानगरमध्ये पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह मेयो हॉस्पिटलकडे रवाना केला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून अमरला अटक केली.
….तर घटना टळली असती!
प्रत्येक तक्रारीवर वेळीच कारवाई करण्याचे निर्देश पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले आहेत. असे असतानाही कळमना पोलिसांनी ललिता यांनी दिलेल्या तक्रारीची वेळीच दखल घेतली नाही. अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद केली. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी वेळीच त्याला चौकशीसाठी बोलावले असते तर खुनाची घटना टळली असती, अशी चर्चा परिसरात आहे. याची चौकशी करण्यात येईल, दोषी आढळल्यास संबंधित कर्मचाऱ्याविरूद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.