म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : पती आणि सासरच्या मंडळींच्या छळाला कंटाळून एका विवाहित तरुणीने आत्महत्या केल्याची घटना बोरिवली येथे घडली आहे. आसाममध्ये राहणाऱ्या आपल्या आईवडिलांना आत्महत्या करत असल्याचा संदेश तिने पाठवला होता. तिने याप्रकारचा संदेश माहेरी केल्याचे तिच्या पतीला माहीत होते, परंतु त्याने त्याकडे दुर्लक्ष केल्याने त्याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा बोरिवली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.असा आहे प्रकारमूळची आसामची असलेली दीपशिखा ही २०२०मध्ये नोकरीच्या निमित्ताने मुंबईत आली. नोकरी करीत असलेल्या कंपनीमध्ये असलेल्या तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध जुळले. दोन्ही घरच्या मंडळींच्या परवानगीने हे दोघे जुलै २०२२मध्ये विवाहबद्ध झाले. काही महिने सुरळीत गेल्यानंतर पती आणि सासू-सासऱ्यांनी दीपशिखाला त्रास देण्यास सुरुवात केली. पुरेसे आणि आवडीचे जेवण न देणे, मेक-अप करण्यास मनाई करणे, क्षुल्लक कारणावरून वाद घालणे असे प्रकार सुरू झाल्याने आईवडिलांच्या सल्ल्यानुसार ती पतीसह स्वतंत्र राहू लागली. मात्र तिथेही असाच मानसिक छळ सुरू होता. या छळाला कंटाळून चार मार्च रोजी तिने डायरीवर एक चिठ्ठी लिहिली. त्याचा फोटो काढून तिने आईवडिलांना पाठवला. यानंतर आईवडिलांना फोन करून तिची समजूत घातली आणि तिच्या पतीलाही याबाबत कळविले.मात्र तिच्या पतीने तिची काळजी घेण्याऐवजी तिच्यासोबत राहणे सोडले व तो आईवडिलांकडे राहण्यासाठी गेला. यामुळे मानसिक तणावाखाली आलेल्या दीपशिखाने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत पतीला जबाबदार ठरविल्याने पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
Home Maharashtra आईवडिलांना मेसेज करुन दीपशिखाने संपविले जीवन; आसामच्या तरुणीसोबत बोरिवलीत असं काय घडलं?