छत्रपती संभाजीनगर: अवकाळी पाऊस आणि शेतमालाचे घसरलेले भाव यामुळे मेटाकुटीला आलेल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे वक्तव्य राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघांमध्येही दोन शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून जीवनयात्र संपवली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही शेतकरी आत्महत्या आणि कांद्याच्या दरांचा मुद्दा गाजला होता. या सगळ्यानंतर राज्य सरकारने अवकाळी पाऊस झालेल्या भागात पंचनामे पूर्ण झाले की तातडीने मदत देऊ, असे आश्वासन दिले होते. या मदतीकडे शेतकरी डोळे लावून बसले असतानाच अब्दुल सत्तार यांनी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रसारमाध्यमांनी त्यांना शेतकऱ्यांच्या आत्महत्यांविषयी विचारणा केली. त्यावर अब्दुल सत्तार यांनी, ‘शेतकरी आत्महत्या हा काही आजचा विषय नाही. अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करत आहेत’, असे उत्तर दिले. अब्दुल सत्तार यांच्या या असंवेदनशीलतेमुळे शेतकऱ्यांच्या रोषात भर पडण्याची शक्यता आहे.

अब्दुल सत्तार यांना त्यांच्या मतदारसंघात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले.यावरही बोलताना अब्दुल सत्तार यांनी थोडीही संवेदनशीलता न दाखवता आपल्या मतदारसंघात सर्वकाही आलबेल आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न केला. माझ्या मतदारसंघात फिरुन आलो. शेतीचं फार काही नुकसान झालेलं नाही. मोठं नुकसान नाही, परंतु जे नुकसान झालं त्याचं पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करणार आहोत, असे सरकारी छापाचे उत्तर अब्दुल सत्तार यांनी दिले. अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्यामुळे विरोधक पुन्हा एकदा आक्रमक होण्याची शक्यता असून हा मुद्दा अर्थसंकल्पीय अधिवेशनात तापण्याची शक्यता आहे.

कांद्याला भाव नाही, घरात खाणारी तोंड नऊ, २५ वर्षांच्या शेतकऱ्याने नको ते पाऊल उचललं

कृषीमंत्र्याच्या मतदारसंघात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

सिल्लोड मतदारसंघातील अंधारी गावात एकापाठोपाठ एक दोन शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणामुळे जीवनयात्रा संपवून घेतल्याची माहिती समोर आली होती. भागिनाथ बाळूबा पांडव (वय ४६ वर्षे), जनार्दन सुपडू तायडे (वय ५५ वर्षे) अशी मयत शेतकऱ्यांची नावे आहेत. दोन्ही शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर होता. याच नैराश्यातून दोघांनीही आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
जात विचारल्यावर चार पैसे कमी होणार का? शेतकऱ्यांमध्ये संताप, खत खरेदीच्या मुद्यावरुन नवा वाद, विधानसभेत पडसाद

पंचनामे झाल्यावर आम्ही शेतकऱ्यांना तातडीने मदत देऊ: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आपण शेतकऱ्यांना मदत देणारच आहोत, तुम्ही घाई करू नका. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. पंचनामे झाले की तात्काळ मदत दिली जाईल. शेतकऱ्यांना मदत करताना सरकार हात आखडता घेणार नाही, आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here