Maharashtra Politics Vidhanbhavan | राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांचे उपोषण. महाविकास आघाडीच्या नेत्यांची एकी, पाणी योजनेसाठी वेगाने चक्रं फिरली.

हायलाइट्स:
- अजित पवार आणि बाळासाहेब थोरात लक्षपूर्वक नितीन देशमुख यांचे म्हणणे ऐकून घेत होते
- अजितदादांनी थेट देवेंद्र फडणवीसांना गाठले
- बाळापूर खाऱ्या पाण्याच्या शुद्धीकरणाची योजना
नितीन देशमुख आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खाली असणाऱ्या पायऱ्यांवर उपोषणाला बसले. तेव्हा महाविकास आघाडीचे नेते तातडीने त्यांची विचारपूस करण्यासाठी पोहोचले. अजित पवार, बाळासाहेब थोरात, सुनील प्रभू, वैभव नाईक, रवींद्र वायकर हे सर्व नेते नितीन देशमुख यांच्याभोवती उभे राहिले. सगळ्यांनी नितीन देशमुख यांच्याकडून बाळापूर मतदारसंघातील रखडलेल्या पाणी योजनेची माहिती जाणून घेतली. अजित पवार आणि बाळासाहेब थोरात लक्षपूर्वक नितीन देशमुख यांचे म्हणणे ऐकून घेत होते. ही सगळी माहिती घेऊन अजित पवार यांनी तडक विधानभवनाच्या आवारात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गाठले. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना बाळापूरमधील योजनेची कागदपत्रे दाखवली आणि नागरिकांच्या समस्या त्यांच्या कानावर घातल्या.
निधीची उधळण; ४० आमदारांचंच सरकार आहे असं वाटतं; अजित पवारांनी यादीच वाचली
नितीन देशमुखांच्या मतदारसंघातील समस्या निकाली काढण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दाखवलेल्या या एकीमुळे सगळी चक्रे वेगाने फिरताना दिसली. नितीन देशमुख यांच्या उपोषणाला काही क्षण उलटत नाही तोच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीही छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापाशी धाव घेतली. ते पायऱ्यांवर नितीन देशमुख यांच्या बाजूला मांडी घालून बसले आणि त्यांचे म्हणणे सविस्तरपणे ऐकून घेतले. या सगळ्यानंतर आता बाळापूर विधानसभा मतदारसंघातील पाणी योजना मार्गी लागणार का? अधिवेशनात यासंदर्भात काही घोषणा केली जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.