देवदत्त निकम यांच्या शेतात दोन वर्ष सतत मेहनत केल्यावर आता या द्राक्ष बागेलागुलाबी व काळ्या रंगाचे मनमोहक द्राक्षांचे घड लगडले आहेत. अतिशय श्रमाने ही द्राक्ष दोन वर्षानंतर तोडणीला आली आहेत. या द्राक्षांना जागेवरच १३५रुपये प्रति किलो असा भाव मिळतो आहे. परदेशात फक्त खाण्यासाठी या द्राक्षांचा उपयोग होतो .साधारणपणे ८ ते १८ टन द्राक्ष निर्यात केली जातात. या द्राक्षबाग उभारणीसाठी निकम यांना एकरी दहा लाख रुपये खर्च आला आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी एकरी तीन लाख रुपये खर्च आला आहे. फक्त संरक्षक जाळीसाठी एकरी पाच हजार रुपये खर्च आला असल्याचं निकम यांनी सांगितलं.
देवदत्त निकम यांच्या द्राक्ष शेतीमुळं ४० ते ५० महिला पुरुषांना रोजगार उपलब्ध झाला आहे. निकम यांच्या संपूर्ण द्राक्ष बागेला ठिबक सिंचनाद्वारे पाणी आणि औषधे दिली जातात. देवदत्त निकम यांच्यासह त्यांच्या घरातील प्रत्येक माणूस या बागेसाठी कष्ट करत आहे. आतापर्यंत त्यांना ३० लाख रुपये खर्च आला असून अंदाजे ७०ते ७५ लाख रुपये निव्वळ नफा मिळाला आहे, असं निकम सांगतात. त्यांची ही बाग पाहण्यासाठी राज्यभरातून शेतकरी येवून भेट देत आहेत.
मजुरांची काळजी
देवदत्त निकम त्यांच्या बागेत कामासाठी येणाऱ्या मजुरांची देखील काळजी घेतात. सकाळीच बागेत दाखल झालेल्या मजुरांची निकम हे पोटच्या मुलाप्रमाणे काळजी घेतात सकाळीच नाश्ता न करून आलेल्या मजुरांना जागेवरच नाश्ता पुरवतात. त्यामुळे त्यांच्याकडे मजुरांची वाणवा नसते.
तरुणांना प्रेरणा
देवदत्त निकम यांनी विज्ञानाची पदवी घेतली असून शेतीमध्ये ते नवनवे प्रयोग करतात. निकम सकाळी सात वाजता बागेत हजर होतात व स्वतः हातात कात्री घेऊन द्राक्ष छाटणे, क्रेट भरणे, ट्रॅक्टरवर द्राक्षांची वाहतूक करणे अशी कामे करतात. त्यामुळे तरुणांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेत दुष्काळी असलेल्या आंबेगाव तालुक्यात द्राक्षांचे मळे फुलवले आहेत. १९७२ चा आंबेगाव तालुका आणि २०२३ चा आंबेगाव तालुका यामध्ये मोठा फरक आहे.