चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या वक्तव्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेतून अपेक्षेप्रमाणे आक्रमक प्रतिक्रिया आल्या आहेत. फक्त ४८ जागा लढवण्यासाठी आम्ही मूर्ख आहोत का? असा खोचक टोला संजय शिरसाट यांनी बावनकुळेंना लगावला आहे. संजय गायकवाड यांनी तर अशा प्रकारची वक्तव्ये केल्याप्रकरणी पक्षश्रेष्ठींनी चंद्रशेखर बावनकुळेंना समज द्यावी, असं म्हटलं आहे. मात्र, बावनकुळे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्या कोणत्याही वक्तव्याला पक्ष स्तरावर महत्व असतंच त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बोलण्याने भाजपच्या मनात काय सुरु आहे हे स्पष्ट होत आहे.
म्हणूनच आता बावनकुळे यांच्या या वक्तव्याने राज्यभरातील शिवसेनेसोबत असलेल्या पण आमदार नसलेल्या नेत्यांचं टेन्शन वाढलं आहे. बावनकुळे यांच्या म्हणण्यानुसार भाजप २४० आणि शिंदे गट४८ जागा लढवणार म्हणजेच शिवसेनेचे विद्यमान ४० आमदार आणि बाकी अपक्ष असा या वक्तव्याचा सरळ अर्थ निघतो. त्यामुळे पुणे शहरात पुन्हा एकदा भाजप आठही विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकणार असल्याचं बोललं जात आहे. पुण्यात तशी शिंदे गटाची ताकद ही मोजकीच आहे. त्याचा भाजपला किती फायदा होणार हे येत्या निवडणुकांत स्पष्ट होईलच. पण, नुकत्याच झालेल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत शिंदे गटाचा भाजपला म्हणावा तसा फायदा झाला नसल्याचं पाहायला मिळालं होतं.
सध्या पुणे शहरात शिंदेंसोबत असणाऱ्या नेत्यांपैकी शहरप्रमुख नाना भानगिरे सोडले तर विधानसभा निवडणूक लढवेल असा तगडा नेता दिसत नाही. मात्र, त्यांचा मतदारसंघ हडपसर हा आहे. याठिकाणी सध्या राष्ट्रवादीचे चेतन तुपे हे आमदार आहेत. तर २०१४ आणि २०१९ साली भाजकडून योगेश टिळेकर यांनी भाजपकडून निवडणूक लढवली आहे. त्यात २०१४ साली टिळेकर विजयी झाले होते तर २०१९ साली थोड्या मतांनी त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे २०२४ साली होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत टिळेकर हे पुन्हा तयारीला लागले असून ते निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.
नाना भानगिरे यांनी २०२४ सालची विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी आधीच सुरु केली आहे. त्यानुसार त्यांची बांधणी देखील सुरु आहे. मात्र, बावनकुळे यांच्या वक्तव्यानुसार शिवसेनेच्या विद्यमान आमदारांनाच पुन्हा तिकीट मिळू शकेल असं दिसतंय, त्यामुळे बावनकुळेंच्या या वक्तव्यानंतर पुण्यात नाना भानगिरे यांचे मात्र टेन्शन कमालीचे वाढले आहे. हा वाद सुरु असतानाच स्वतः बावनकुळे आणि भाजपच्या नेत्यांनी सारवासारव केली आहे. पण पुण्याप्रमाणेच राज्यभरात स्थानिक पातळीवर शिवसेना आणि भाजप युतीत या वक्तव्यानंतर वादाची ठिणगी पडली आहे हे मात्र नक्की.