एम.आय.एम. चे जिल्हाध्यक्ष डॉ. परवेज अशरफी, जिल्हा महासचिव जावेद शेख, शहर अध्यक्ष सरफराज जहागीरदार, कार्याध्यक्ष मतीन शेख यांनी ही मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. यासाठी त्यांनी इतिहासाचा दाखला दिला आहे. छत्रपती संभाजीनगरप्रमाणेच अहमदनगरमध्येही नामांतराची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, नवीन नावावर येथे एकमत होत नसल्याचे दिसून येते येते. आतापर्यंत अंबिकानगर श्रीरामनगर, आनंदनगर अशा अनेक नावांची मागणी होत राहिली. गेल्यावर्षी भाजपचे आमदार पडळकर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या कार्याचा गौरव म्हणून अहिल्यानगर हे नाव सूचविले. भाजपकडूनही ते उचलून धरण्यात आले. त्यामुळे गेल्या अधिवेशनात या नावावर कार्यवाही करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
ही प्रक्रिया सुरू झालेली असताना इतर नावांचीही मागणी पुढे येत आहे. आता एमआयएमने ‘शाहशरीफनगर’ हे नाव सूचविले आहे. यासंबंधी त्यांनी म्हटले आहे की, अहमदनगर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा ऋणानुबंध अत्यंत जुना आहे. त्यांचे पूर्वज मालोजीराजे भोसले, शहाजीराजे भोसले, शरीफजी राजे भोसले यांची कारकिर्द याच शहरात बहरली. त्यांनी येथे अनेक पराक्रम केले.१६२४ मधील भातोडीची लढाई जगप्रसिध्द आहे. या लढाईमधे शिवरायांचे वडील शहाजीराजे यांनी फार मोठा पराक्रम गाजविला होता. त्यांनी गनिमी कावा वापरून भातोडीचा तलाव फोडला व शत्रूसैन्याला हरवले होते. या लढाई नंतर शहाजीराजेंना ’सरलष्कर’ हा किताब दिला गेला होता. याच लढाईत त्यांचे बंधु व शिवरायांचे चुलते शरीफजीराजे हे शहीद झाले. त्यांची समाधी आजही भातोडी या गावी आहे.
शिवरायांचे पुर्वज शहाजीराजे व शरीफजी राजे यांचे कायमस्वरूपी स्मारक व्हावे. यासाठी महापालिकेच्या येत्या सभेमधे ’शाहाशरीफनगर’ नाव देण्याबाबतचा ठराव अजेंड्यावर घेऊन तो सर्वानुमते मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.