Mumbai Rain updates | गेल्या काही दिवसांमध्ये राज्याच्या ग्रामीण भागामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती. त्यामुळे शेतीचे नुकसान झाले होते. त्यानंतर आता मुंबईतही जोरदार पाऊस बरसताना दिसत आहेत.

हायलाइट्स:
- मुंबईत सकाळपासून जोरदार पाऊस
- आकाशात काळ्या ढगांची गर्दी
- वाऱ्याचा जोरही जास्त असल्याने पावसाची तीव्रता चांगलीच वाढली आहे
या पार्श्वभूमीवर मुंबईतील हवामान खात्याने एक महत्त्वाचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात पुढील तीन ते चार तास पावसाचा जोर असेल. यावेळी ढगांचा गडगडाट आणि वीजा चमकण्याची शक्यता आहे. तसेच वादळी वाऱ्याचा जोरही राहील. मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरात ३० ते ४० KMPH वेगाने वारे वाहतील, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे मुंबई आणि ठाण्यात पुढील काही तासांत पावसाची तीव्रता कायम राहील.
दरम्यान, आज सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. सध्या पावसाच्या सरी अधुनमधून बरसत आहेत. मात्र, पावसाचा जोर आणखी वाढल्यास रस्त्यांवर पाणी साचून रस्ते वाहतूक मंदावण्याची शक्यता आहे. आकाशातील काळ्या ढगांची गर्दी पाहता पावसाच्या आणखी काही सरी बरसण्याची शक्यता आहे. या सगळ्यामुळे मुंबई आणि ठाणेकरांना ऐन मार्च महिन्यात पावसाळी ऋतुचा अनुभव येत आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.