चेन्नई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी वनडे उद्या २२ मार्च रोजी चेन्नईत होणार आहे. भारताने पहिल्या सामन्यात शानदार विजय मिळवला होता. त्यानंतर दुसऱ्या लढतीत ऑस्ट्रेलियाने १० विकेटनी विजय मिळवत जोरदार कमबॅक केला. मालिका १-१ अशी बरोबरीत असल्याने तिसरी लढत निर्णयाक झाली आहे. या लढतीत विजय मिळवणारा संघ मालिका जिंकले. ही लढत भारतीय वेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरू होईल.

तिसऱ्या वनडेत टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल यावर सर्वांची नजर असणार आहे. पहिल्या दोन लढतीत डाव्या हाताने गोलंदाजी करणाऱ्या मिचेल स्टार्कच्या समोर टीम इंडियाची दाणादाण उडाली होती. भारतीय संघासाठी हा विषय फार गंभीर होत चालला आहे. सूर्यकुमार यादवची कामगिरी देखील फार खराब होत चालली आहे. पहिल्या दोन सामन्यात पहिल्याच चेंडूवर त्याला स्टार्कने बाद केले. यामुळेच आता तिसऱ्या वनडेत त्याला संधी मिळेल का याबाबत चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान कर्णधार रोहित शर्माने सूर्यकुमारला आणखी संधी मिळेल असे संकेत दिले आहेत.

दुसरी वनडे झाल्यानंतर रोहितने म्हटले होते की, श्रेयस अय्यर कधी संघात परतेल याबाबत आम्हाला कल्पना नाही. श्रेयसची जागा रिकामी आहे आणि तेथे आम्ही सूर्यला संधी देणार आहोत. मी ही गोष्ट अनेक वेळा बोललो आहे की ज्याची क्षमता असेल त्याला संधी मिळेल. सूर्याला देखील कल्पना आहे की वनडेत चांगली कामगिरी करायची आहे. क्षमता असलेल्या खेळाडूंना कधीच असे वाटता कामा नये.

IND vs AUS: निर्णयाक लढतीत पाऊस पडणार का? असे आहे पिच रिपोर्ट आणि रेकॉर्ड
चेपॉकवरील पिच साधारणपणे संथ असते. पण उद्या मॅचच्या दिवशी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ज्याचा अर्थ डावाच्या सुरुवातीला जलद गोलंदाजांची भूमिका फार महत्त्वाची होईल. भारताने येथे खेळलेल्या अखेरच्या लढतीत जलद गोलंदाजांना मदत मिळाली होती. अर्थात तेव्हा वेस्ट इंडिजने २८८ धावांचे लक्ष्य फक्त २ विकेट गमावत पार केले होते. जर यावेळी देखील जलद गोलंदाजांना मदत मिळाली तर भारताच्या फलंदाजांना सुरुवातीची १० षटके संभाळून खेळावी लागतील.

कोण होणार संघाबाहेर

तिसऱ्या वनडेत भारत आक्रमक रणनितीचा वापर करू शकते आणि यासाठी ३ जलद गोलंदाज संघात असू शकतील. याचा अर्थ संघात शार्दुल ठाकूर किंवा उमारन मलिक यांना संधी दिली जाऊ शकते. त्यात ही मलिकला अधिक संधी मिळू शकते कारण त्याच्याकडे वेग आहे आणि जो या पिचवर उपयोगी ठरू शकतो.

उमरान किंवा शार्दुलला संधी दिली तर अक्षर पटेल संघाबाहेर होऊ शकतो. या शिवाय संघ व्यवस्थापन कुलदीप यादवच्या जागी वॉशिंग्टन सुंदरला अंतिम ११ मध्ये स्थान देऊ शकतो. सुंदर गोलंदाजी सोबत फलंदाजीत योगदान देऊ शकतो. फलंदाजीच्या लाइनअपमध्ये कोणताही बदल होण्याची शक्यता नाही.

या खेळाडूंमधून होणार अंतिम ११ची निवड

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here