कोल्हापूर : शेतकरी कष्टकरी व्यापारी महिला वर्ग तसेच समाजातील विविध प्रश्नांवर सातत्याने संघर्ष सुरू असून रस्त्यावरची लढाई अद्याप संपलेली नाही. लोकांची मुंडकी पिरगळून राज्य करणाऱ्यांना ठणकावून सांगणे गरजेचे झाले आहे, असे म्हणत आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी पूर्ण ताकतीने उतरणार असून हातकणंगले मतदारसंघासह पाच ते सहा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्र लढेल अशी घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार यांनी केली आहे. आंबा तालुका शाहूवाडी येथे सुरू असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अभ्यास शिबिराच्या सांगता सभेत कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शन करत होते. अगोदर भाजप आणि नंतर महाविकास आघाडी सोबत राहूनही संघर्ष करावा लागत असल्याने आणि छोट्या पक्षांना दुर्लक्ष करत असल्याने राजू शेट्टी यांनी दोघांशीही काडीमोड घेतला. यानंतर चळवळीच्या माध्यमातूनच त्यांनी संघर्ष सुरूच ठेवला. तर आता २०२४ च्या निवडणुकांचे वेध राजकीय पक्षांना लागले असून याच पार्श्वभूमीवर माजी खासदार राजू शेट्टी यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. आम्ही महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडलो आहोत. शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, महिला वर्ग आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर आमचा सरकारशी सातत्याने संघर्ष चालू आहे. रस्त्यावरची लढाई संपलेली नाही. केंद्र व राज्य सरकारचा कारभार हा लोकशाहीच्या विरोधात आहे. लोकांची मुंडकी पिरगाळून तुम्हाला राज्य करता येणार नाही, असे ठणकावून सांगणे गरजेचे आहे. आम्ही मांडलेला हमीभावाचा कायदा अजून प्रलंबित आहे. केंद्र जोपर्यंत हमीभावाचा कायदा करत नाही, तोपर्यंत आमचा संघर्ष थांबणार नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न जैसे थे आहेत. त्यावर कोणत्याच सभागृहात चर्चा केली जात नाही. त्यासाठी शेतकरी प्रश्नावर बोलणारे लोकप्रतिनिधी सभागृहात निवडून जाणे गरजेचे आहे, असं राजू शेट्टी म्हणाले. स्वाभिमानी शेतकरी संघटना २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मैदानात पूर्ण ताकदीनिशी उतरणार असून हातकणंगलेसह राज्यातील पाच ते सहा लोकसभेच्या जागा स्वतंत्रपणे लढविणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी आज केली. नेमक्या कोणत्या जागा स्वाभिमानी लढवणार त्याचा राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. जालंधर पाटील, सावकर मादनाईक, राजेंद्र गड्ड्यान्नावर, जनार्दन पाटील, अजित, संदीप राजोबा, सचिन शिंदे, आदी उपस्थित होते.
Home Maharashtra आता कुणाच्या साथीने नाही, स्वतंत्रपणे लोकसभा लढणार, राजू शेट्टींनी मतदारसंघाचा आकडाच सांगितला