नोकरी सोडणाऱ्यांची सर्वाधिक संख्या सीमा सुरक्षा दलात आहे. याबद्दलची माहिती गृह मंत्रालयानं संसदीय समितीला दिली आहे. गेल्या पाच वर्षांत म्हणजेच २०१८ ते २०२२ या कालावधीत ६५४ जवानांनी आत्महत्या केल्याची आकडेवारीदेखील गृह मंत्रालयानं दिली. जवान नोकरी सोडूत जात असल्याचा परिणाम सीएपीएफच्या कामकाजावर होऊ शकतो. जवानांना सेवेत कायम ठेवायचं असल्यास, त्यांना रोखण्यासाठी कामाची स्थिती सुधारायला हवी, अशी शिफारस समितीनं केली आहे.
जवानांना पोस्टिंग देत असताना रोटेशनल पॉलिसी वापरायला हवी. त्यामुळे जवानांना दुर्गम भागात अधिक काळ राहावं लागणार नाही. या धोरणामुळे आवडत्या ठिकाणी पोस्टिंग मागण्याचं प्रमाणही कमी होईल. त्यामुळे नोकरी सोडण्याचं प्रमाण कमी होऊ शकेल, असं समितीनं म्हटलं आहे.
गेल्या वर्षी सेवेतून बाहेर पडलेले सर्वेश २०१४ मध्ये सीआरपीएफमध्ये रुजू झाले होते. त्यांना सर्वात आधी गढचिरोलीत तैनात करण्यात आलं. त्यानंतर जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये पाठवण्यात आलं. आठ वर्षांच्या नोकरीनंतर त्यांनी सीएपीएफला अलविदा केला. जवानांना कुटुंबासोबत राहू दिलं जात नाही. कुटुंबासोबत राहणाऱ्या जवानांची संख्या अतिशय कमी आहे, असं सर्वेश यांनी सांगितलं.
सीआरपीएफसारख्या विभागांमध्ये जवानांची संख्या कमी आहे. त्यामुळे जवानांवर कामाचा अधिक ताण आहे. त्यांना वेळेवर सुट्टी मिळत नाही. लहानसहान सुविधा मिळवण्यासाठी आम्हाला न्यायालयात जावं लागतं. दलात पदोन्नतीदेखील फार उशिरा मिळते. एका अधिकाऱ्याला पदोन्नतीसाठी १३-१४ वर्षे वाट पाहावी लागते, अशी व्यथा सर्वेश यांनी मांडली.
समजून घ्या, सायबर फ्रॉड करताना नेमके तुमचे डिटेल्स समोरच्याला कसे मिळतात?
केंद्रीय सशस्त्र दलाचे जवान देशांतर्गत भागांमध्ये आणि सीमावर्ती भागांमध्ये तैनात असतात. त्यांच्या अंतर्गत सीआरपीएफ, सीआयएसएफ, आयटीबीपी, एसएसबी, एनएसजी आणि आसाम रायफल्सचे जवान येतात. या सगळ्या विभागांमध्ये जवळपास १० लाख जवान आहेत. गृह मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, सशस्त्र दलांमधील ८३ हजारांहून अधिक जागा रिक्त आहेत. यावर्षी रिक्त जागा भरण्याचं आश्वासन सरकारनं दिलं आहे.