मुंबई : मला धर्मांध हिंदू नको, मला धर्माभिमानी हिंदू हवा आहे. मला मुसलमान पण माझ्या सोबत हवा आहे पण तो मुसलमान जावेद अख्तर ह्यांच्या सारखा मुसलमान हवा. असा मुसलमान पाकिस्तानात जाऊन त्यांना २६/११ च्या हल्ल्याबद्दल कडक शब्दांत सुनावून येईल, अशा शब्दात मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी ज्येष्ठ अभिनेते जावेद अख्तर यांनी घेतलेल्या भूमिकेचं कौतुक केलं आणि पाकिस्तानात जाऊन त्यांना सुनावल्याबद्दल अख्तर यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा परंपरेनुसार गुढीपाडवा मेळावा आज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. जवळपास ४० हजार मनसैनिकांनी शिवाजी पार्क फुलून गेलं होतं. राज ठाकरेंनी अपेक्षेप्रमाणे आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. तसेच शिंदे फडणवीस सरकारला देखील राज ठाकरेंनी आपल्या स्टाईलने सुनावलं.

मला जावेद अख्तरांसारखा माणूस हवा

तुमची हिंदुत्वाची व्याख्या काय? हिंदू म्हणून तुम्ही कुणाकडे बघता? असं परवा मला कुणीतरी विचारलं. त्यावेळी मी सांगितलं मला धर्मांध हिंदू नकोय, मला धर्माभिमानी हिंदू हवाय. जो स्वत:चा धर्म बघेल, दुसऱ्या धर्माचाही मान राखेल. मला माणसं हवीत, मुस्लिम धर्मामधली देखील हवीत पण ती कोणासारखी हवीत तर जावेद अख्तरांसारखी हवीत… त्यांनी पाकिस्तानात जाऊन तिथल्या लोकांना सुनावलं. आमच्या मुंबईवर तुमच्या माणसांनी हल्ला केला, ती जखम आम्हाला अजूनही असल्याचं छातीठोकपणे त्यांनी सांगितलं. असे मुस्लिम मला हवेत आहेत, असं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर संपूर्ण शिवाजी पार्कमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला.

उद्धव ठाकरेंवर तुफान टीका, फडणवीसांना कळकळीची विनंती, नांदगावकरांची शिवतीर्थावर डरकाळी!
ते बांधकाम तोडा नाहीतर तिथे गणपतीचं मंदिर बांधतो

दुसरीकडे माहिमजवळच्या खाडीत नवीन हाजी अली बांधण्याचा प्रयत्न सुरु आहे. हे अनधिकृत बांधकाम तोडा, नाहीतर आम्ही तिथे मोठं गणपतीचं मंदिर उभं करू, अशी गर्जना राज ठाकरे यांनी केली. जसं अनधिकृत दर्ग्यावर तुमची नजर जात नाही, मग आम्हीही गणपती मंदिर बांधल्यावर तुम्ही आमच्याकडे दुर्लक्ष करा, असंही राज ठाकरे म्हणाले. तसेच अजूनही सुरु असलेला भोंगे बंद करा, असं आवाहनही राज ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला केलं.

सभा कसल्या घेता, कामं करा…

माझी एकनाथ शिंदेंना सांगणं आहे की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, तुम्ही जनतेची कामं करा. महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न आहेत, त्याकडे लक्ष द्या. त्यांच्या मागे सभा घेत बसू नका. त्यांनी वरळीत सभा घेतली, की शिंदेनी घेतली वरळीत सभा घेतली. त्यांनी खेडमध्ये सभा घेतली घेतली, शिंदेनी खेडमध्ये सभा. थांबवा हे सगळं. अवकाळीने शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, ते पाहा, सभा कसल्या घेता? असा हल्लाही त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here