मुंबई: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात माहीमच्या समुद्रात अनधिकृत मजार बांधली जात असल्याचा आरोप केला होता. राज ठाकरेंच्या सभेला काही तास उलटत नाही तोच आता मुंबई महानगरपालिकेचे पथक याठिकाणी कारवाईसाठी पोहोचले आहे. राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणात या वादग्रस्त मजारीचा उल्लेख केला होता. त्यांनी या मजारीचा व्हिडिओही दाखवला होता. ही मजार अनधिकृत आहे, त्यामुळे ती तोडण्यात यावी. हे बांधकाम तोडलं नाही तर आम्ही तिथे गणपतीचं मंदिर उभं करु, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता.

राज ठाकरे यांच्या या इशाऱ्यानंतर मुंबई पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाकडून तातडीने हालचाली सुरु झाल्या होत्या. मुंबई पोलिसांनी राज ठाकरे यांच्या भाषणानंतर काल रात्रीपासूनच या मजारीच्या परिसरात बंदोबस्त तैनात केला आहे. त्यानंतर आज सकाळ उजाडताच मुंबई महानगरपालिकेचे पथक याठिकाणी पोहोचले. पालिकेचे अधिकारी आणि कामगारांनी याठिकाणी येताना सोबत पाडकामासाठी वापरण्यात येणारे मोठे हातोडे, दोरखंड आणि घमेली आणली होती. त्यामुळे माहीमच्या समुद्रातील मजारीच्या परिसरातील चौथरा आणि इतर अनधिकृत बांधकाम पाडण्यात येणार असल्याचे समजते. याशिवाय, माहीमच्या समुद्रकिनाऱ्यावर एक जेसीबीही आणण्यात आला आहे. जेणेकरून मजारीच्या परिसरातील अनधिकृत बांधकामाच्या पाडकामानंतरचा ढिगारा तात्काळ हटवण्यास मदत होईल.

राणेंनी सेना कशी सोडली? उद्धव ठाकरेंचा रोल काय? राज ठाकरेंनी एक एक करुन सगळं सांगितलं
आज सकाळपासूनच मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांचे पथक माहीमच्या समुद्रकिनाऱ्यावर तैनात आहे. कारवाईच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी माहीम परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?

माहीमच्या मगदूनबाबाच्या समोर, अनधिकृत मजार बांधली जात आहे. दोन वर्षांमध्ये हे उभं केलं आहे, लोकांचं लक्ष नाही. महापालिकेच्या लोकांनीही हे पाहिलं नाही. दिवसाढवळ्या समुद्रात नवीन हाजीअली तयार केली जात आहे. आता प्रशासनाला, मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, पोलीस कमिशनर, पालिका आयुक्त आजच सांगतो, महिन्याभरात जर कारवाई झाली नाही, हे जर तोडलं नाही, त्याच्या बाजूला सगळ्यात मोठं गणपतीचं मंदिर उभं केल्या शिवाय राहणार नाही. मग काय व्हायचं ते होऊन जाऊ दे. त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असाल तर आमच्याकडे दुर्लक्ष करा, असे राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात म्हटले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here