अहमदनगर : गुढी पाडव्याच्या दिवशी मराठी नववर्षाची सुरुवात देवदर्शनाने करून मध्यरात्रीच्या सुमारास आपल्या गावाकडे निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातल्याची घटना घडली आहे. अहमदनगर-पुणे महामार्गावर नगर तालुक्यात कामरगाव शिवारात झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार तर ११ जण जखमी झाले. हे भाविक पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील आहेत. नगर जिल्ह्यात शनिशिंगणापूर आणि देवगड येथे दर्शन घेऊन ते गावी परतत होते.

या अपघाताबाबतची अधिक माहिती अशी की, शिरूर तालुक्यातील आमदाबाद आणि चिंचोली मोर या गावातील १६ जण एका टेम्पोमधून प्रवास करत होते. नगर-पुणे महामार्गावर कामगारगावजवळ पुण्याकडून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या टेम्पोला धडक दिली. भरधाव वेगात असलेल्या ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक टेम्पोवर येऊन आदळल्याचे सांगण्यात आले. यामध्ये राजेंद्र साळवे, विजय अवचिते, धीरज मोहिते, मयूर साळवे यांचा मृत्यू झाला. जखमींना नगर शहरातील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर माहीमच्या समुद्रातील मजारीच्या परिसरात कारवाई; पालिकेचं पथक हातोडे घेऊन पोहोचलं

गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्याची काही नागरिकांची प्रथा आहे. त्यानुसार शिरूर तालुक्यातील हे भाविक देवदर्शनासाठी एकत्रितपणे बाहेर पडले होते. टेम्पोतून प्रवास करीत त्यांनी नगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर आणि देवगड येथेही दर्शन घेतले. त्यानंतर रात्री उशिरा ते आपल्या गावी निघाले होते. कामरगावजवळ मध्यारात्रीच्या सुमारा हा अपघात झाला.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक नागरिक आणि नंतर पोलीसही मदतीला धावले. जखमींना रुग्णालयात हलवण्यात आले. या अपघातात चार जण ठार झाले असून त्यामध्ये एका बालकाचाही समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here