मुंबई: गेल्या काही महिन्यांतील सत्तासंघर्षामुळे एकमेकांशी हाडवैऱ्याप्रमाणे वागू लागलेल्या भाजप आणि ठाकरे गटाच्या प्रमुखांनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी एकाचवेळी विधानभवनाच्या आवारात प्रवेश केला. गेल्या काही काळात निर्माण झालेल्या वितुष्टामुळे हे दोन्ही नेते एकमेकांकडे तोंड फिरवून पुढे निघून जातील, असे सगळ्यांना वाटत होते. मात्र, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्यात सारे काही सुरळीत आहे अशा अविभार्वात एकमेकांनी मनमोकळेपणाने गप्पा मारायला सुरुवात केली. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हसतखेळत विधिमंडळाच्या दिशेने चालत गेले. यादरम्यानच्या काळात फडणवीस आणि ठाकरे यांच्या हालचालींमध्ये एकमेकांशी बोलताना कुठलाही अवघडलेपणा जाणवत नव्हता, किमान त्यांनी तो जाणवून दिला नाही. अगदी २०१४ नंतर दोन्ही नेत्यांमध्ये ज्याप्रकारचे सख्य होते, त्याचप्रकारे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकमेकांशी बोलताना दिसले.

अजून काहीही बिघडलेलं नाही, उद्धवजी पुन्हा एकदा शांतपणे विचार करा; फडणवीसांच्या भेटीनंतर ठाकरेंना सभागृहातच ऑफर

गेल्या काही काळात भाजप आणि शिंदे गटाने ठाकरे गटाचे राजकीय अस्तित्त्व पुसून टाकण्यासाठी हरप्रकारे आणि शक्य तितके प्रयत्न केले आहेत. त्यामुळे साहजिकच देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या क्षणिक (?) मनोमिलनाची राजकीय वर्तुळात सर्वत्र चर्चा रंगली होती. हा प्रसंग म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येण्याची नांदी आहे का, अशी शंकेची पाल अनेकांच्या मनात चुकचुकली. विशेष म्हणजे या सगळ्यानंतर सभागृहातही भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे का होईना, परत येण्याची साद घातली. अजूनही काही बिघडलेलं नाही, उद्धवजी पुन्हा एकदा शांतपणे विचार करा, असे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले.

एकनाथ शिंदेंचा करिष्मा चालला नाही, ठाकरेंची सहानुभूती कायम राहिल्यास भाजपचा प्लॅन बी, मोदींकडे पाठवला प्रस्ताव

उद्धव ठाकरे यांचे सूचक वक्तव्य

देवेंद्र फडणवीस यांची भेट आणि सभागृहात सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या ऑफरनंतर उद्धव ठाकरे यांनी विधानभवनाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि तुमची भेट नव्या राजकीय समीकरणांचे संकेत आहेत का, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला. यावर उद्धव ठाकरे यांनी वरकरणी मजेशीर वाटत असले तरी सूचक इशारा देणारे भाष्य केले. उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, ‘पूर्वी खुलेपणा होता. आता बंद दाराआडच्या चर्चा अधिक फलदायी होते असे म्हणतात. आता भविष्यात आमची बंद दाराआड चर्चा झाली तर तेव्हा बोलू. आज सकाळी आम्ही दोघे एकत्र प्रवेशद्वारातून प्रवेश करताना रामराम, हाय हॅलो करतो तसं झालं, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी काढता पाय घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here