मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं आडनाव ठाकरे नसतं, तर ते आज संगीतकारांमध्ये दिसले असते, अशी जहरी टीका शिवसेनेचे आमदार आणि नवनिर्वाचित पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे. नाशिकमध्ये पोटनिवडणुकीच्या प्रचारात ते बोलत होते.
‘बाळासाहेबांना ज्यांनी धोका दिला, त्यांचा सत्यानाश झाला आहे. एक पानवाला आज राज्याचा कॅबिनेट मंत्री आहे. ही किमया बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्येच होते. मनसे आता आहे तरी कुठे? यांच्या नेत्याचं आडनाव ठाकरे नसतं, तर आज कुठेतरी संगीतकारांमध्ये दिसले असते. ठाकरे आडनाव असल्याने त्यांच्याभोवती वलय आहे’, अशा शब्दात गुलाबराव पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली.
गुलाबराव यांनी यावेळी विरोधकांवर सडकून टीका केली. ‘भाजपवाले म्हणतात हे सरकार चालणार नाही? म्हणजे तुम्ही कोणाशीही युती केलेली चालते आणि आम्ही केली की चालत नाही?’, असा सवाल गुलाबरावांनी यावेळी उपस्थित केला. भाजप निवडणुकीत फक्त पैशाचा वापर करते बाकी त्यांच्याकडे दुसरं काही नाही, असा आरोपही गुलाबराव यांनी केला आहे.
नाशिकमधील प्रभाग क्रमांक २६ मधील पोटनिवडणुकीत उभे असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार मधुकरराव जाधव यांच्या प्रचारासाठी गुलाबराव पाटील नाशिकमध्ये आले होते. यावेळी झालेल्या जाहीर सभेत त्यांनी मनसे आणि भाजपवर शरसंधान केले.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times