अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तुरीला ६ हजार ९२० पासून ८ हजार ६३० रूपयांपर्यंत प्रतिक्विंटल प्रमाणे भाव मिळाला असून सरासरी भाव ८ हजार २०० रूपये इतका आहे. गेल्या दोन दिवसात तुरीची आवकही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काल २ हजार ४६६ क्विंटल तुरीची खरेदी झाली होती तर आज शुक्रवारी २ हजार २२५ क्विंटल तुरीची आवक झाली आहे. कालच्या तुलनेत आज तुरीच्या दरात १८० रुपयांनी वाढ झाली आहे. मंगळवारी तुरीचे भाव कमीत कमी ५ हजार ५०० पासून जास्तीत जास्त ८ हजार ५०५ रूपयांपर्यंत होते. तर गुरुवारी तुरीच्या दरात ५५ रुपयांनी घसरण झाल्याने तुरीला ६ हजार पासून ८ हजार ४५० रूपयांपर्यंत प्रतिक्विंटल प्रमाणे भाव मिळाला होता.
दरम्यान अकोल्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या कापसाला ७ हजार ७०० पासून ८ हजार ११८ रूपयांपर्यंत प्रतिक्विंटल प्रमाणे भाव मिळाला. तर सरासरी भाव ७ हजार ८०० रूपये इतका आहे. कापसाच्या दराच्या तुलनेत तुरीला ५३० रुपयांनी अधिक भाव आहे.
अकोला जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. परंतु कापसाला यंदा हवा तसा भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग नाराज आहे. विदर्भातील अनेक भागात यंदा अतिवृष्टीचा फटकाही तुरीला बसलाय. त्यात काही भागात तुरीवर आजार आढळून आला होता. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी वाचवलेल्या पिकाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंददायी वातावरण पसरले आहे.
हरभऱ्याच्या दरात ८० रुपयांनी वाढ
दरम्यान अकोल्यात आज हरभऱ्याच्या दरात ८० रुपयांनी वाढ झाली आहे. काल कमीत कमी ४ हजार पासून जास्तीत जास्त ४ हजार ८४५ रूपये असून सरासरी भाव ४ हजार ५०० इतका होता. आज या दरात ८० रुपयांनी वाढ झाल्याने हरभऱ्याचे दर ४ हजार ते ४ हजार ९२५ रूपयांपर्यत प्रतिक्विंटरप्रमाणे पोहचले. आज ४ हजार ३६० क्विंटल इतकी हरभऱ्याची आवक झाली आहे. तसेच पांढऱ्या हरभऱ्याला ९ हजार ६५० रूपयांपर्यंत भाव होता. तर लोकल गव्हाला १ हजार ७०० पासून जास्तीत जास्त २ हजार २८० इतका असून सरासरी भाव १ हजार ९६० रूपये इतका होता.