पुणे : जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार या गावात पती पत्नीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून नवरा बायकोने हे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. आज ( शुक्रवारी) मध्यरात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली आहे. पिंपरी पेंढार येथील नवलेमळा या भागात ही घटना घडली आहे. दोघे नवरा बायको हे मेंढपाळ आहेत, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या घटनेने ओतूर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तीन महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह झाल्याची माहिती समोर आली आहे. सोमनाथ संभाजी कुलाळ (वय २५) व मनीषा सोमनाथ कुलाळ (वय २०) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमनाथ आणि मनीषा कुलाळ यांचा तीन महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर गेल्या तीन महिन्यांपासून कुलाळ हे मेंढपाळ दांपत्य मेंढ्यांसह पिंपरी पेंढार गावाच्या नवलेवाडी परिसरात वास्तव्यास होते. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या दोघांमध्ये किरकोळ वाद झाला आणि या वादातूनच त्यांनी आपले जीवन संपवले असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. ते रहात असलेल्या काही अंतरावरच ती विहीर आहे. ही घटना घडल्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना या बाबत माहिती दिली. त्यांनी विहिरीतून मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
तीन महिन्यातच संसार संपला
सोमनाथ कुलाळ आणि मनीषा कुलाळ यांचा तीन महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. त्यांनी टोकाचं पाऊल उचललं आणि नुकत्याच सुरु झालेल्या संसाराची अखेर झाली आहे.
अनेकदा आत्महत्या करण्यामागे अगदी किरकोळ कारण असते. त्यामुळे काही व्यक्ती रागाच्या भरात स्वतःचे जीवन संपवतात. मात्र त्यांनी काहीच उपयोग होत नाही. त्याचा त्रास मागच्या व्यक्तींना सहन करावा लागतो. त्यामुळे आत्महत्या करणे अत्यंत चुकीचं असून रागात भरात असे चुकीच टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या करू नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
Causes Of Stomach Cancer | जठराच्या कॅन्सरची कारणं आणि निदान | Maharashtra Times