जुन्नर परिसरात असणाऱ्या मानमोडी डोंगर रांगेत भुतलेनी हा लेण्यांचा समूह आहे. अनेक पर्यटक या ठिकाणी या लेणी पाहण्यासाठी येत असतात. मुंबईहून काही पर्यटक शनिवारी दुपारच्या सुमारास पर्यटनासाठी आले होते. लेण्यांच्या कोपऱ्यात मधमाशांचे पोळे बसलेले होते. लेण्यांमध्ये अंधार असल्याने पर्यटकांनी मोबाइलची लाइट सुरू केली. फोटो काढत असताना मोबाइलची लाइट ब्लिंक करत असल्याने मधमाशांचे लक्ष विचलित झाले. आणि त्यांनी काही क्षणात पर्यटकांवर हल्ला चढवला. त्यामुळे आपले मोबाइल आणि साहित्य तिथे ठेवून पर्यटकांनी जीव वाचवत घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, मधमाशांनी हल्ल्यात त्यांना जखमी केले होते, अशी याबाबत अधिक माहिती मिळाली आहे.
या हल्यात पुष्पावती कांबळे, प्रियदर्शन कांबळे, आरती वाघमारे, सुवर्णा कांबळे, पंडित थोरात या पर्यटकांवर जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे या ठिकाणी आलेल्या इतर पर्यटकांनाही तिथून काढता पाय घ्यावा लागला. मधमाशांचा डंख हा अतिशय विषारी असतो. त्यात माणसाला जीवही गमवावा लागू शकतो. त्यामुळे लेण्यांमध्ये जाताना किंवा कुठल्याही पर्यटनस्थळी जाताना आपली काळजी घेऊन जाणे गरजेचे आहे. अन्यथा आपल्या जीवावर बेतू शकते.
मसाल्यांनी ओळख दिली, थेट मनीषाताईंच्या मसाल्यांची संयुक्त राष्ट्र संघाकडून दखल, २०० देशांत पोहोचणार किर्ती
लेण्यांमध्ये मधमाशा मोठ्या प्रमाणावर असतात. त्यात आता उष्णतेचे वातावरण असल्याने त्या जास्त बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे अशा ठिकाणी जाताना काळजी घेणे गरजेचे असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. या मधमाशांच्या हल्ल्यातून वाचवण्यासाठी प्रशांत कबाडी, वनरक्षक रमेश खरमाळे, तेजस शिंदे, ऋषिकेश गाढवे, भरत चिलप, दिपक सांगडे यांनी पर्यटकांना मदत केली.