राज्यात परिवर्तनाचा निर्धार करत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उत्तर महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे. चार दिवसाच्या या दौऱ्यात नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक या जिल्ह्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून स्थानिक पातळीवरील राजकीय परिस्थितीचा आढावा ते घेणार आहेत.
स्थानिक पातळीवर प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षसंघटना वाढीवर आणि सभासद नोंदणीवर मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रीत करा, असं आवाहन जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केलं. गावागावात पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते निर्माण करण्याची गरज आहे. पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सर्वांनी मिळून हातभार लावावा. एकसंघ राहून पक्षाचे काम केल्यास त्याचा उत्तम निकाल आपल्याला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सामान्य जनतेला आपल्या पक्षाकडून अनेक अपेक्षा आहेत. राज्याला प्रगतीच्या वाटेवर नेण्यासाठी या विश्वासाला पात्र ठरेल असे लोकोपयोगी काम करूया असे आवाहनही जयंतराव पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.
दौऱ्याची सुरुवात नंदुरबार जिल्हयातील शहादा विधानसभा मतदारसंघातून झाली. शहादा येथे घेतलेल्या या आढावा बैठकीला ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे, माजी मंत्री हेमंत देशमुख, नंदुरबार जिल्हा निरीक्षक नानासाहेब महाले, नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे, धुळे जिल्हाध्यक्ष सुरेश सोनावणे, माजी आमदार उदयसिंग पाडवी, जिल्हा उपाध्यक्ष मोहन शेवाळे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.