भाजी विक्रेत्यांना प्रभाग अधिकाऱ्यांकडून पास घेऊन नेमून दिलेल्या जागेवरच सकाळी नऊ ते सायंकाळी सात वेळेत विक्री करता येणार आहे. खाद्य पदार्थ पार्सल देता येणार आहेत. चहा, पान, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री ३१ ऑगस्टपर्यंत बंदच राहणार आहेत, असे आदेशात स्पष्ट केले आहे.
करोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लागू केलेल्या अनलॉक तीनचा टप्पा सुरु झाला आहे. अनलॉक तीन मध्ये काही सुविधा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्याबाबतची सुधारित नियमावली पालिकेने प्रसिद्ध केली आहे. यापूर्वी शहरातील सर्वच भागातील शॉपिंग मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स सुरु करण्यास परवानगी दिली होती. परंतु, त्याऐवजी केवळ प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट) झोनबाहेरील शॉपिंग मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स सुरु करण्यास परवानगी दिली आहे.
वाचाः
प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील लॉज, गेस्ट हाऊस अशी निवासी सुविधा पुरविणारे हॉटेल व्यावसायांकरिता काही अटींच्या आधारे ३३ टक्के क्षमतेने सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पालिकेने हॉटेलमध्ये आयसोलेशन, क्वारंटाईन केंद्र म्हणून मान्यता दिली असेल तर, शंभर टक्के वापर अनुज्ञेय राहील. हॉटेल किंवा लॉजिंग मधील रेस्टॉरंट, कॅन्टीनची सोय केवळ तेथे निवासी राहणाऱ्या प्रवाशांसाठी सुरु राहणार आहे, असे आदेशात नमूद केले आहे.
शहरातील खासगी कार्यालये १५, १० टक्के किंवा जास्ती असेल त्या मनुष्यबळासह सुरु ठेवता येतील. सकाळी नऊ ते सायंकाळी सात कालावधीतच दुध, भाजीपाला विक्री सुरु राहील. किरकोळ भाजी विक्रेत्यांना प्रभाग अधिकाऱ्यांनी पास दिल्यानंतरच नेमून दिलेल्या जागेवर भाजी, फळे विक्री करता येणार आहे.
पथारी विक्रेते अथवा फेरीवाले यांना पास मिळाल्यानंतरच किरकोळ सामान विक्री करता येईल.
अन्न, खाद्य पदार्थ विक्री करिता पालिका, अन्न व औषधी प्रशासनाद्वारे अनुज्ञप्ती प्राप्त व्यावसायिकांना फक्त पार्सल सेवेद्वारे विक्री अनुज्ञेय राहील. या विक्री केंद्रावर अन्न पदार्थाचे सेवन करता येणार नाही. गर्दी, सुरक्षित अंतराचे पालन करावे लागणार आहे. पान, तंबाखूचा वापर करण्यास मनाई आहे. पुढील आदेशापर्यंत हे नियम लागू असणार आहेत, असे हर्डीकर यांनी म्हटले आहे.
करोना अपडेट
शहरात मंगळवारी (चार ऑगस्ट) करोनाबाधित नवीन रुग्णांपेक्षा आजारातून मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि करोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या नऊशे जणांना घरी सोडण्यात आले. तर, शहराच्या विविध भागातील ६२९ जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. आजपर्यंतची रुग्णसंख्या २४ हजार ३११ झाली आहे. तर, १७ हजार १०६ जण बरे झाले आहेत. करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ५०५ आहे. तर, तीन हजार ७८३ सक्रीय रुग्णांवर उपचार चालू आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times