नांदेड : कुटुंबातील मंडळींचा प्रेमाला विरोध असल्याने एका प्रेमीयुगुलाने विष प्राशन करून आत्महत्या केली. जिल्ह्यातील हदगांव तालुक्यातील दर्याबाई उमरी या गावात आठ दिवसांपूर्वी ही धक्कादायक घटना घडली. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतर हदगांव पोलिसांनी बुधवारी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. अंजली थोरात आणि आकाश वाठोरे असं या प्रेमीयुगुलाचे नाव आहे.अंजली थोरात ही लहान असताना तिच्या आईचे निधन झाले. त्यानंतर ती हदगांव तालुक्यातील दर्याबाई उमरी या गावात आपल्या आजोबांकडे राहत होती. शिक्षण सुरू असताना तिचे गावातील आकाश वाठोरे या तरुणाशी प्रेमाचे सूर जुळले. ही बाब दोघांच्या कुटुंबियांना समजली आणि कुटुंबियांनी विरोध सुरू केला. काही दिवसानंतर अंजलीच्या मामाने तिचे लग्न नात्यातील एका मुलाशी लग्न लावून दिले.
लग्नानंतर अंजली आणि तिचा पती पुणे येथे वास्तव्यास होता. मात्र लग्नानंतरही अंजली आणि आकाशमध्ये संवाद सुरू होता. याची कुणकुण मुलीच्या कुटुंबियांना लागली. काही दिवसानंतर आकाश वाठोर हा प्रेयसीच्या घरी गेला आणि तिला घेऊन परत आपल्या गावी आला, दोन्ही कुटुंबियांकडून समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र २९ मार्च रोजी प्रेमीयुगुलानी सोबत जगता आलं नाही तर काय झालं, आपण सोबत मरू, असं म्हणत विष प्राशन केले.
दरम्यान, ही बाब समजल्यानंतर नातेवाईकांनी दोघांनाही रुग्णालयात दाखल केले. परंतु ३० मार्च रोजी दोघांचाही मृत्यू झाला. शवविच्छेद अहवाल प्राप्त झाल्यानंतर हदगांव पोलिसांनी बुधवारी आकास्मिक मृत्यूची नोंद केली असून या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.