याबाबत घोषणा करताना रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, या नवीन प्रस्तावाच्या अंमलबजावणीनंतर नावीन्यपूर्णतेला प्रोत्साहन मिळेल. यूपीआयने भारतातील पेमेंटची पद्धत बदलली आहे. वेळोवेळी उत्पादने आणि वैशिष्ट्ये विकसित करण्यासाठी यूपीआय मजबूत करण्यासाठी विविध पावले उचलली गेली आहेत. याशिवाय रुपे क्रेडिट कार्डला यूपीआयशी लिंक करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
पेमेंटची पद्धत कशी बदलेल?
आतापर्यंत यूपीआयवरून पेमेंट थेट बँक खात्याशी लिंक करून करता येते. त्याच वेळी, पेमेंट ॲपच्या मदतीने वॉलेट वापरून पेमेंट देखील केले जाऊ शकते. याशिवाय रुपे क्रेडिट कार्डद्वारेही पेमेंट करता येते. मात्र, आता आरबीआयच्या नव्या घोषणेमुळे पेमेंटबाबत आणखी एक मोठा दिलासा मिळणार आहे.
बँकेत ठेव नसली तरी पेमेंट
आरबीआयच्या या प्रस्तावाच्या अंमलबजावणीनंतर, ग्राहक त्यांच्या बँक ठेवींमधून तसेच पूर्व-मंजूर क्रेडिट्समधून यूपीआय पेमेंट करू शकतील. सोप्या भाषेत यूपीआय नेटवर्कद्वारे ग्राहक पेमेंटसाठी बँकांनी दिलेल्या क्रेडिटचा देखील वापर करू शकतील. यूपीआयवर क्रेडिट लाइनची सुविधा ग्राहकांसाठी पॉइंट-ऑफ-परचेस अनुभव अधिक चांगला आणि सुलभ करेल. आरबीआय याबाबत सविस्तर माहितीही जारी करेल.
UPI क्रेडिट लाइन म्हणजे काय?
क्रेडिट पॉलिसीच्या घोषणेनंतर आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर टी रविशंकर म्हणाले की यामुळे लोकांना क्रेडिट कार्डची संख्या कमी करून UPI द्वारे व्यवहार करण्याची संधी मिळेल. UPI द्वारे ग्राहक बँकेच्या क्रेडिट लाइनचा वापर करू शकतील.
महागाई वाढली की बँका कर्जाचे हप्तेही वाढवतात, हे आहे त्यामागचं कारण