मुंबई:खारघरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यात लाखो श्रीसेवक हे उन्हातान्हात बसून होते. ते पाण्यावाचून तडफडत होते. मात्र, त्याचवेळी मैदानात उभारलेल्या एसी शामियान्यात शाही जेवणावळी सुरु होत्या, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यासाठीच्या या सोहळ्यात लाखोंची गर्दी होती. या गर्दीला उन्हातान्हात बसवून ठेवण्यात आले. या श्रीसेवकांच्या डोक्यावर सावलीसाठी छप्पर उभारण्यात आले नव्हते. कारण त्यांना ड्रोन कॅमेऱ्याने गर्दीचे चित्रण करायचे होते. ड्रोन कॅमेऱ्याने त्यांना कार्यक्रमाला किती गर्दी जमली आहे, हे दाखावायचे होते. हा सदोष मनुष्यवध नाही का? तुम्ही तुमची मस्ती आणि कंडू शमवण्यासाठी लोकांचे बळी घेतले, अशा शब्दांत संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. ते शुक्रवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी संजय राऊत यांनी खारघर दुर्घटनेवरुन पुन्हा एकदा राज्य सरकारला लक्ष्य केले. सरकारमध्ये हिंमत असेल तर खारघरच्या दुर्घटनेत नेमके किती लोक आणि कसे मेले, हे सांगावे. ज्या लाईट्स अँड शेड्स कंपनीला कार्यक्रमाच्या आयोजनाचे कंत्राट देण्यात आले होते, ती कंपनी कोणाची आहे? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्येतील कार्यक्रमालाही याच कंपनीकडे काम होते. या कंपनीतील भागीदार कोण आहेत, हे मुख्यमंत्र्यांनी सांगावे. खारघर दुर्घटनेत समोर आलेला मृतांचा आकडा १४ आहे, पण खरा आकडा ५० पेक्षा जास्त असल्याचा पुनरुच्चार संजय राऊत यांनी केला.

खारघर दुर्घटनेसाठी ती एक चूक ठरली कारणीभूत? सरकारी विभागाने उष्मालाटेचा इशारा दिला होता, पण…

यावेळी संजय राऊत यांनी खारघर दुर्घटनेच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीबाबतही शंका उपस्थित केली. ही एक सदस्यीय समिती खारघरच्या मैदानातील शाही मेजवानीची चौकशी करणार आहे का?, असा सवाल त्यांनी विचारला. ज्या सांस्कृतिक खात्याकडून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्या खात्याचे मंत्री कुठे आहेत? ते परदेशात जाऊन बसले आहेत का, हे तपासा, असे संजय राऊत यांनी म्हटले.

Kharghar Tragedy: तहानेने जीव कासावीस, नळांमधून गरम पाणी; टँकरभोवती उसळलेल्या गर्दीने श्रीसेवकांचा जीव घुसमटला

कार्यक्रमासाठी दुपारीच वेळ का निवडली, आयएस अधिकारी जबाबदार आहेत का? अजित पवारांचा सवाल

अजित पवार यांनीही शुक्रवारी पुण्यात बोलताना महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील दुर्घटनेविषयी भाष्य केले. खारघर घटनेतील मृतांच्या संख्येत तफावत असल्याचे सांगण्यात येत आहे. आरटीआय मध्ये पोस्ट मॅार्टमरिपोर्ट मागितले आहे. राज्यपालांकडे न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे. एकीकडे उन्हातान्हात नागरिक बसले होते तर दुसरीकडे एसीमध्ये चांदीच्या ताटांमध्ये जेवणावळ सुरू असल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्या फोटोंची सत्यताही तपासण्याची आवश्यक आहे. या घटनेला कोण कोण जबाबदार आहे. भरदुपारची वेळ का निवडली गेली? आयएस अधिकारी त्याला जबाबदार आहे का? या पुरस्कार वितरणासाठी आजपर्यंतचा सर्वाधिक खर्च झाल्याची चर्चा आहे. पोस्टमॅार्टममध्ये मयत सेवकांच्या पोटात सात ते आठ तास अन्न नसल्याचे निष्पन्न झाल्याची चर्चा आहे. न्यायालयीन चौकशीनंतर वस्तुस्थिती समोर आल्यानंतर सरकारचा राजीनामाही मागण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here