अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाचा ऐतिहासिक सोहळा बुधवारी मंगलमय वातावरणात पार पडला. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मंदिराची कोनशिला ठेवण्यात आली. मंत्रोच्चाराच्या साक्षीने हा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी देशाला संबोधून छोटेखानी भाषण केले. भाषणात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यस्थापनेचा उल्लेख केला होता. ‘ज्याप्रमाणे मावळे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या कार्यात निमित्त झाले, त्याचप्रमाणे देशातील सर्व जनतेच्या सहकार्यानं राम मंदिराच्या पुनर्निमाणाचे पुण्य कार्य होऊ घातले आहे,’ असं मोदी म्हणाले होते.
उदयनराजे यांनी मोदी यांच्या भाषणाची ती क्लिप ट्विटरच्या माध्यमातून शेअर केली आहे. तमाम देशवासीयांसमोर मोदींनी केलेला श्री शिवछत्रपतींचा व मावळ्यांचा उल्लेख हा महाराष्ट्राचा सन्मान व गौरव आहे,’ असं त्यांनी म्हटलं आहे.
भिडेंनी केली होती शिवप्रतिमेच्या पूजनाची मागणी
शिवाजी महाराजांमुळेच देशावरील परकीय आक्रमणे थोपवता आली. हिंदुत्व जागृत राहिले, यामुळे अयोध्येतील भूमिपूजनाच्या कार्यक्रमात केंद्र सरकारने अगत्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करावे, अशी आग्रही मागणी शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी केली होती.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times