इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राच्या बातमीनुसार बालाकोटमधील राष्ट्रीय रायफल्सच्या बसूनी मुख्यालयातून ट्रकमधून साहित्य पोहोचवण्यात येत असते. त्यामुळं राष्ट्रीय रायफल्सचे जवान या भागात तैनात असतात.
संगियोते गावाचे सरपंच मुख्तियाज खान यांनी दुर्दैवी घटनेत आपले पाच जवान शहीद झाले आहेत, आता कसला इफ्तार असं म्हटलं. आम्हाला ग्रुपवर दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाली आणि गावावर शोककळा पसरली आहे. शनिवारच्या दिवशी केवळ नमाज पठण करण्यात येईल, गावातील लोक ईद साजरी करणार नाहीत, असंही ते म्हणाले.
जळालेल्या ट्रकचे फोटो समोर आले आहेत. त्यामध्ये प्लास्टिकचा क्रेट, टरबूज, सफरचंद आणि इतर वस्तू दिसत होत्या, असं सरपंच मुख्तियाज खान म्हणाले. मुख्तियाज खान यांच्यासह संगियोते गावानं काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करणाऱ्यांना आपल्या कृतीतून उत्तर दिलं आहे.
सैन्य दलाकडून या हल्ल्यानंतर शोधमोहीम सुरु करण्यात आली आहे. जंगलात सात दहशतवादी लपले असण्याची शक्यता असल्यानं ते दिसताच त्यांना गोळी मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सुरुवातीला ३ ते ४ दहशतवाद्यांच्या गटानं हल्ला केल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. एनआयएकडून देखील या घटनेची चौकशी सुरु करण्यात आली आहे. पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मद संघटनेशी संलग्न असलेल्या पीएएफएफनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याची माहिती आहे.
दरम्यान, राष्ट्रीय रायफल्सचे पाच जवान दहशतवादी हल्ल्यात शहीद झाले. लान्स नाईक देबाशिष बसवाल, लान्स नाईक कुलवंत सिंह, हवालदार मनदीप सिंह, शिपाई हरकृष्ण सिंह आणि शिपाई सेवक सिंह शहीद झाले.