सौरभ बेंडाळे, म. टा. प्रतिनिधी, नाशिक :अग्निवीर भरती अंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या जवानाचा उष्माघातामुळे मृत्यू झाला. नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. हर्षल संजय ठाकरे (वय २१ वर्ष, आर्मी नं. I ३४५१७४६) असे निधन झालेल्या जवानाचे नाव आहे. मयत जवान हे मूळ धुळे जिल्ह्यातील रहिवासी होते.उलट्या व ताप याचा त्रास झाल्यामुळे हर्षल ठाकरे यांना आर्टिलरी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मयत घोषित केले. या प्रकरणी नाशिकमधील देवळाली कॅम्प पोलिस पुढील तपास करीत आहेत.
नवी मुंबईतील खारघर परिसरात आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात उष्माघातामुळे मोठी दुर्घटना घडल्यानंतर आता नाशिकमध्येही असाच प्रकार उघडकीस आला आहे. लष्करी प्रशिक्षण कालावधीत जवानाला उष्माघातामुळे उलटी व तापाचा त्रास झाल्याची माहिती आहे.
नवी मुंबईतील खारघर परिसरात आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात उष्माघातामुळे मोठी दुर्घटना घडल्यानंतर आता नाशिकमध्येही असाच प्रकार उघडकीस आला आहे. लष्करी प्रशिक्षण कालावधीत जवानाला उष्माघातामुळे उलटी व तापाचा त्रास झाल्याची माहिती आहे.
हर्षल ठाकरे यांना त्रास होत असल्याने लान्स नायक नरेंद्र सिंग यांनी त्यांना आर्टिलरी सेंटरमध्ये दाखल केले. तिथे डॉ. भरत शिंदे यांनी ठाकरे यांना तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी आर्टिलरी सेंटरतर्फे लेखी माहितीद्वारे पोलिसांना कळवण्यात आले आहे. त्यानुसार देवळाली कॅम्प पोलिसांनी हर्षल ठाकरे यांच्या मृत्यू प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
इतर जवानांची आरोग्य स्थिती व हर्षल ठाकरे यांना उष्माघाताचा त्रास का झाला, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. देवळाली कॅम्प पोलिस पुढील तपास करीत आहेत. मात्र, या दुर्दैवी घटनेमुळे नाशिकमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.