पुणे :पुण्यात भरधाव वेगातील ट्रकची एका खासगी बसला मागून धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात काल पाच जणांचा मृत्यू झाला. हा अपघात कात्रजच्या नवीन बोगद्यातून दरीपुलाकडे जाताना स्वामीनारायण मंदिराजवळ रविवारी मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास घडला. मृतांमध्ये खासगी बसमधील चार जणांचा, तर ट्रकमधील एकाचा समावेश असून या अपघातात २२ प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातानंतर पुन्हा एकदा प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील जांभूळवाडी येथील दरी पुलापासून ते नवले पुलापर्यंत मोठ्या प्रमाणात तीव्र उतार आहे. त्यामुळे सातत्याने येथे अपघात होतात. स्वामीनारायण मंदिर-भूमकर चौक-नऱ्हे सेल्फी पॉइंट या एक ते दीड किलोमीटर परिसरात तीव्र उतारासोबत वळणही आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत याच ठिकाणी अपघात झाले असून, अनेकांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाने मध्यंतरी उपाययोजना केल्या होत्या. मात्र, ठोस आणि उपायकारक अंमलबजावणी न झाल्यामुळे अपघाताचे सत्र सुरूच आहे.

शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट; मुसळधार पावसासह गारपिटीची शक्यता, पुढील पाच दिवस महत्त्वाचे

कायमस्वरूपी उपाययोजनांचे प्रयत्न

रस्ते सुरक्षा समितीच्या माध्यमातून नवले पूल परिसरात होणाऱ्या अपघातांचा आढावा घेण्यात आला. ‘सेव्ह लाइफ फाउंडेशन’कडून उपाययोजनांचा अभ्यास करण्यात आला आहे. संस्थेने दिलेल्या अहवालाच्या आधारे अनेक ठिकाणी रम्बलर स्ट्रीप लावणे, रस्त्यांच्या बाजूचे अतिक्रमण काढणे, साइडपट्टी लावणे, पोलिसांचा बंदोबस्त वाढवणे, वेग मर्यादेवर नियंत्रण करणे आदी उपायोजना केल्या आहेत. याशिवाय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणालाही सूचना देण्यात आल्या असून, कायमस्वरुपी उपाययोजना करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना काय?

– समितीने घटनेचा अभ्यास करून सात दिवसांत अहवाल सादर करावा.

– या प्रकारचे अपघात कमी करण्याच्यासाठी तातडीच्या उपाययोजना सुचवाव्यात.

– या ठिकाणच्या अपघातांबाबत ‘सेव्ह लाइफ फाउंडेशन’च्या अहवालाचा अंतर्भाव असावा.

अपघाताच्या चौकशीसाठी समिती

मुंबई-बंगळुरू महामार्गावर स्वामीनारायण मंदिराजवळ झालेल्या अपघाताची तीव्रता लक्षात घेता घटनेच्या चौकशीचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला. त्यासाठी वाहतूक पोलिस शाखेचे उपायुक्त विजय मगर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. समितीमध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सदस्य असतील. प्रादेशिक परिवहन अधिकारी सदस्य सचिव म्हणून काम पाहतील, असे डॉ. देशमुख यांनी नमूद केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here