उन्हाने त्रस्त होऊन फळांचा ज्यूस पिण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर सावधान. कारण ताज्या फळांचा ज्यूस पिण्याऐवजी तुम्ही सडक्या फळांचा ज्यूस तर पीत नाही ना याची खात्री करु घ्या. कारण नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारातील एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला असून. या व्हिडीओमध्ये एक तरुण एपीएमसीमध्ये व्यापाऱ्यांनी फेकून दिलेली सडकी सफरचंद उचलताना दिसत आहे. तसेच हे सफरचंद ज्यूस तयार करण्यासाठी घेऊन जात असल्याची कबुली या फळे वेचणाऱ्याने स्वतः दिली आहे.
एपीएमसी मार्केटच्या जागेमध्येच व्यापाऱ्यांनी खराब झालेले सफरचंद फेकून दिली होती. ही सफरचंद खाण्यायोग्य नसून त्यांचा खराब वास येत होता. मात्र तरी सुद्धा ही सडलेली सफरचंद गोळा केली जात आहेत. व्हिडिओमध्ये दिसत असलेली ही व्यक्ती सफरचंद गोळा करण्यामध्ये मग्न झालेली आहे. तेवढ्यातच त्याला सफरचंद कशासाठी घेऊन जात आहे, असा प्रश्न विचारला असता तो घाबरून पटकन बोलून जातो घरी ज्यूस तयार करण्यासाठी. त्यामुळे हेच सडलेले सफरचंद घरी नेऊन त्याचा ज्यूस तयार केला जातो आणि मग तो ज्यूस फुटपाथवर किंवा रस्त्यावर जागा मिळेल तिथे बसून विकला जातो. गरम होत असल्यामुळे थोडासा थंडावा मिळावा यासाठी अनेक जण रस्त्याच्या कडेला उभे राहिलेल्या विक्रेत्यांकडून ज्यूस विकत घेऊन आवडीने पितात. पण खरं पाहायला गेलं तर हे असे ज्यूस पिणे आपल्या शरीरासाठी खूपच घातक आहे. दोन पैशांसाठी हा अशाप्रकारे सामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरु असल्याचे चित्र वारंवार समोर येत असते. यापूर्वीही रेल्वे स्थानकावरील लिंबू सरबत, पाणी पुरीवाल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला होता.
एपीएमसीबाहेर तसेच एपीएमसीपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या सानपाडा रेल्वे स्थानकाजवळ अनेक ज्यूसवाले असून यातील काही ठिकाणी ज्यूस तयार करण्यासाठी सडक्या फळांचा वापर होत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासनाने यावर योग्य ती कारवाई करावी अन्यथा आमच्याकडून घेतली जाईल असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.