रत्नागिरी :राजापूर तालुक्यातल्या बारसू सोलगाव परिसरात माती परीक्षणासाठी आजपासून प्रस्तावित रिफायनरीसाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. पण या परिसरात आता तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. रिफायनरी विरोधक महिला आंदोलकांनी पोलिसांची वाहनं आडवली आहेत. यामुळे मोठा तणाव निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. पोलिसांनी रिफायनरी विरोधी संघटनेच्या अध्यक्षांना मुंबईत अटक केली आहे. तर सर्वेक्षण सुरळीत पार पडण्यासाठी १८०० पोलीस तैनात करण्यात आले आहेत.राजापूर बारसू सोलगाव येथे सर्वेक्षणाच्या कामाला वेग आला आहेत. सर्वेक्षणाला लागणारे सामान घटनास्थळी दाखल झाल आहे. मात्र या सगळ्या सर्वेक्षणाला स्थानिक ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात विरोध दिसून येत आहे. विरोध करणाऱ्या ग्रामस्थांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. रिफायनरी सर्वेक्षणासाठी लागणाऱ्या सामानाची वाहतूक करणारे गाड्या बारसू परीसरात दाखल झाल्या आहेत. आज मंगळवारी या ठिकाणी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात पुन्हा वाढवण्यात आला आहे. तर या ठिकाणी वाटेतच आंदोलक महिला रस्त्यावरती आडव्या झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी समजावल्यानंतरही ग्रामस्थ घरी परतलेले नाहीत. यामुळे तणावाची परिस्थिती आहे. खारघर आणि पेण येथून मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा येथे दाखल झाला आहे. एकंदरीत या सगळ्या ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी स्वतः लक्ष देऊन आहेत.

रिफायनरीसाठी माती सर्वेक्षण होणार, विरोधाच्या पार्श्वभूमीवर बारसू सोलगाव परिसरात मनाई आदेश जारी
सोमवारी संध्याकाळपासूनच या सगळ्या परिसरात स्थानिक ग्रामस्थ एकत्र आले आहेत. आणि ते येथून हलण्यास तयार नाहीत. या सगळ्या प्रकरणात काही ग्रामस्थ आणि विरोधक ऐकण्यास तयार नसल्याने पोलिसांकडून धरपकड सुरू करण्यात आली आहे. बारसू सोलगाव परिसराला अक्षरशः पोलीस छावणीचं स्वरूप आलं आहे.

सर्वेक्षणासाठी एक भला मोठा कंटेनरही या परिसरात दाखल झाला आहे. सर्वेक्षणासाठी येत असलेल्या अधिकारी आणि पोलिसांच्या गाड्यांच्या समोर रिफायनरी विरोधक महिलांनी आडवे होत रस्त्यावरच झोपल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला होता. सर्वेक्षण थांबवत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, असा आक्रमक पवित्रा आंदोलक महिलांनी घेतला आहे. या ठिकाणी पोलिसांनी ग्रामस्थांना समजावून सांगितलं. पण त्यांनी ऐकलं नाही. यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.
रिफायनरी सर्वेक्षण: मला हॉस्पिटलला जायचं नाही, जे व्हायचं ते इथेच होऊ दे; ती महिला चक्कर आल्यानंतरही हटली नाही
दरम्यान, या ठिकाणी दाखल झालेल्या प्रसारमाध्यमांनाही प्रशासनाला सहकार्य करण्याचा आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केलं आहे. आपण या ठिकाणी पुढे जाऊन मनाई आदेशाचा भंग करू नका, असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. या ठिकाणी उपस्थित असलेल्या मीडियाच्या प्रतिनिधींनाही बाजूला करण्यात आलं आहे.
मोठी बातमी: बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी निघालेली पोलिसांची गाडी उलटली, १७ जण जखमी
राजापूरमध्ये सर्वेक्षणाची तयारी सुरू आहे. दुसरीकडे ग्रामस्थांचं आंदोलन सुरू आहे. पण या आंदोलनावर बोलण्यासाठी एकही राजकीय नेता समोर आलेला नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या परिसरातील आमदार राजन साळवी हे आहेत. तेही गेले काही दिवस या परिसरात दिसले नाहीत. सरकारकडून रिफायनरी प्रकल्प बाबत ग्रामस्थांवर दडपशाही सुरू असल्याचा आरोप खासदार विनायक राऊत यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता.

Ratnagiri News Marathi | रत्नागिरी बातम्या | Ratnagiri Local News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here