छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत यावर्षी सुद्धा ५ हजार ७०० हून अधिक मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखवला आहे. छाननी मध्ये आमचे उमेदवार बाद झाले त्याचा फटका बसला आहे. २००० हून अधिक वाढीव सभासद होते, त्याचा त्यांना फायदा झाला. अनेकांची इच्छा बदल व्हावा अशी होती. आम्ही मोठ्या मनाने हा पराभव मान्य करतोय, आम्ही आत्मपरीक्षण करू असं सतेज पाटील म्हणाले.
निवडणूक म्हटलं की संघर्ष असतोच पण २ हजारांहून अधिक वाढीव सभासद ज्यांचा ऊस सुद्धा जात नाही ते केवळ मतदानासाठी वाढवले होते. त्याचाच फटका आम्हाला बसला. कोल्हापूरमध्ये जे घडलं त्याला आम्ही त्यांच्या उत्तराला प्रत्युत्तर दिले. गेल्या पंचवार्षिकच्या तुलनेत हातकणंगले मध्ये त्यांना १२०० पेक्षा जास्त होते ते यावेळी कमी झाली. मतदान वाढवले तरीही त्यांचे मताधिक्य कमी राहिले. २०१५ ला मतदान किती होते आणि आता मतदानं किती झालं. जे वाढीव सभासद होते, जे ऊस उत्पादक नाहीत, त्यांचं वाढीव मतदान निर्णायक ठरलं आहे, असं पाटील यांनी सांगितलं.
देश पातळीवर आणि राज्य पातळीवरील महत्त्वाचा मुद्दा आहे. अनेक ठिकाणी खोटं आधार कार्ड घेऊन मतदान झालं. शिरोलीत, पट्टणकोडोलीत खोटे आधार कार्डवाले मतदार माघारी गेले. खोटे आधार कार्ड असलेले २५० मतदार परत गेले, असं सतेज पाटील यांनी सांगितलं. कसबा बावड्यातील आमच्या मृत सभासदांच्या जागी नवे सभासद ट्रान्सफर झाले नाहीत, असं सतेज पाटील म्हणाले.
राजकारणात वर खाली होत असतं. एक निवडणूक झाली म्हणून आम्ही थांबलोय असं नाही. निवडणुकीची रणधुमाळी संपलेली आहे. अनेक गोष्टी महिनाभरापासून दुर्लक्षित आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात विकासकामं प्रलंबित आहेत ती पूर्ण करणं हा अजेंडा असेल. २१ उमेदवार माझ्यावर विश्वास ठेवून उभे होते. पाच दहा हजार कार्यकर्ते पाच सात वर्ष राबत होते. नेता म्हणून त्यांना आधार देण्याची गरज असते, असं सतेज पाटील म्हणाले.