जिल्ह्यातील मनगुत्ती या गावात स्थानिक नागरिकांनी बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटक सरकारच्या आदेशावरून रातोरात हटवण्यात आला आहे. या घटनेमुळे शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कर्नाटक सरकारच्या या घटनेचा निषेध करीत आज कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवसेनेने कर्नाटक सरकारच्या प्रतिमेचे दहन केले. यावेळी “जय भवानी जय शिवाजी”, “कर्नाटक सरकारचा धिक्कार असो” “कर्नाटक शासनाची दडपशाही खपवून घेतली जाणार नाही”, अशा घोषणा देत शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर दणाणून सोडला.
राजेश क्षीरसागर म्हणाले, देशाचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन केला जाणार नाही. भाजपचं जिथे सरकार आहे तिथेच छत्रपती शिवरायांचा अवमान करण्याचे कृत्य घडले आहे. ही गोष्ट वेळीच सरकारने रोखावी, अन्यथा कोल्हापुरातील शिवसैनिक शांत बसणार नाहीत. शिवरायांचा अवमान करणाऱ्यांची शिवसेनेशी गाठ असेल, याची दखल घ्यावी. घडलेली घटना शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना कळविली असून, पक्षप्रमुखांचा आदेश आल्यास कर्नाटकात घुसून कर्नाटक सरकारचा मस्ती उतरवू, असा इशाराही क्षीरसागर यांनी दिला. यावेळी शहरप्रमुख रविकिरण इंगवले, दीपक गौड, रविभाऊ चौगुले, अरुण सावंत, जयवंत हारुगले यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कर्नाटक सरकारचेच कारस्थान
मनगुत्ती ग्रामपंचायतीच्या परनावगीने या गावातील एका चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता. परवानगी न घेता हा पुतळा बसविल्याने तो हटवण्यात यावा यासाठी पोलिसांनी दबाव आणला होता. हा पुतळा चौकातून काढून दुसरीकडे एखाद्या सभागृहासमोर बसवावा असेही पोलिसांकडून सांगण्यात येत होते. पण त्याला नागरिकांना विरोध केला. पोलिसांच्या विरोधात मनगुत्ती येथील नागरिक रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर पोलिसांनी माघार घेतली होती. मात्र, कर्नाटक सरकारने आदेश दिल्यानंतर शुक्रवारी रातोरात हा पुतळा पोलिसांनी हटवला. सरकारच्या या मनमानी कारभारावरून महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील शिवभक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. गावातील दोन गटातील वादातून हा पुतळा हटविण्यात आल्याचा खुलासा कर्नाटक सरकार करत आहे. पण शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्यात जी तत्परता सरकारने दाखवली, त्यामध्ये त्यांचा महाराष्ट्र द्वेष लक्षात येत असल्याची टीका होत आहे. सोमवारपर्यंत हा पुतळा आहे त्या जागेवर न बसविल्यास आंदोलन करण्याचा इशारा या गावातील नागरिकांनी दिला आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times