जालना : लालवडी गावातील एका अनोख्या विवाहाची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा होत आहे. विवाह हा प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्वाचा व अविस्मरणीय क्षण असतो. त्यामुळे हा सोहळा स्पेशल व्हावा अशी प्रत्येकाची हौस असतेच. मात्र जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील लालवाडी येथील एका तरुणाने या सर्व विचारांना फाटा देत कर्तव्याला महत्त्व दिल्याने या विवाहाची चर्चा होत आहे. सख्ख्या मोठ्या भावाच्या अपघाती निधनानंतर लहान भावाने विधवा वहिनीचा दोन मुलांसह स्वीकार करून कुटुंबाची विण घट्ट बांधली आहे. त्याच्या या निर्णयाने समाजासमोर एक आदर्श उभा केला आहे. नवविवाहित जोडपे अल्पशिक्षित असून त्यांनी घेतलेल्या निर्णयाने उच्चशिक्षितांनाही अंतर्मुख व्हायला भाग पाडलं आहे.याबाबतची सविस्तर माहिती अशी की, जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील लालवाडी या जवळपास १०० उंबरे असलेल्या छोट्याशा गावातील ही घटना समाजातील बदलत्या विचारांना पाठबळ देणारी ठरली आहे. बदनापूरपासून ३० किलोमीटर अंतरावर डोंगराच्या पायथ्याशी ३५० लोकवस्तीचे लालवाडी हे गाव आहे. या गावात पाणी, दवाखाना यासह इतर सुविधा नाहीत. गावात एक प्राथमिक शाळा आहे. येथील बहुसंख्य नागरिक शेती व मजुरी करून उदरनिर्वाह करतात. या गावातील भीमसिंग प्रेमसिंग कटारे यांचा २४ फेब्रुवारी २०१३ रोजी अपघाती मृत्यू झाला होता.

महाराष्ट्र पाऊस अंदाज: विदर्भासह या भागांत पुन्हा मुसळधार पाऊस बरसणार, यलो अलर्ट जारी

या घटनेमुळे कटारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मयताची पत्नी मधुमालती यांच्यावरील पतीचेही छत्र हरवले. त्यांची दोन वर्ष व साडेतीन वर्ष वयाची दोन मुले वडिलांच्या मायेला पोरकी झाली होती. या घटनेनंतर मयताची पत्नी व मुलांचे काय असा प्रश्न उभा ठाकलेला होता. अचानक घडलेल्या या दुर्दैवी घटनेने सगळेच निशब्द झाले होते. मयतचा लहान भाऊ दिलीप प्रेमसिंग कटारे हा अविवाहित होता. कुटुंबातील सदस्यांनी त्याला आपल्या मयत भावाचा संसार पुन्हा उभा करण्यासाठी तुला पाऊल उचलावे लागेल, अशी गळ घातली. त्यानंतर त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी मधुमालती व दिलीप यांचा विवाह लावण्याबाबत मुलींच्या माहेरच्या लोकांशी चर्चा केली. त्यांनी देखील या निर्णयाचे स्वागत करत या विवाहाला नातेवाइकांसह दिलीप व मधुमालती यांनी मोठ्या मनाने संमती दिली.

एक नाटकांचं गाव; २१५ वर्षांची समृद्ध नाट्यपरंपरा, अभिनय ते वेशभूषा गावकऱ्यांना बालपणीच मिळतं बाळकडू

दिलीपचे शिक्षण इयत्ता नववी पर्यंतचे असून, मधुमालती यांचे शिक्षण इयत्ता पाचवीपर्यंत झालेले आहे. शिक्षणाच्या जास्त पायऱ्या न चढलेल्या या दोघांनी कर्तव्याची जाण ठेवत या निर्णयाला संमती दिली आणि या दोघांचा विवाह पार पडला. या विवाहाची माहिती मिळताच जि.प. शाळेच्या मुख्याध्यापिका मंदाकिनी पाटोळे यांनी सहशिक्षिका डी. एम. जोंधळे, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष व सदस्यांना सोबत घेऊन समाजापुढे नवा आदर्श उभा करणाऱ्या या दाम्पत्याचा सत्कार केला. या सोबतच गटशिक्षणाधिकारी नारायण कुमावत, विस्ताराधिकारी क्षीरसागर, देशमुख यांनी दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here